भोर : तालुक्यातील तीनपैकी उत्रौली-कारी हा एकमेव गट सर्वसाधारण असून, निवडणुकीत मोठ्या प्रमाणात चुरस वाढली आहे. राष्ट्रवादीचा एक अपवाद वगळता हा गट काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला असून, तो पुन्हा ताब्यात ठेवण्यासाठी काँॅग्रेस, तर गट आपल्याकडे घेण्यासाठी राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. काँग्रेसकडून आनंदराव आंबवले, तर राष्ट्रवादीकडून रणजित शिवतरे उमेदवार असले, तरी आमदार संग्राम थोपटेंविरुद्ध जिल्हा परिषदेचे माजी सभापती रणजित शिवतरे यांच्या प्रतिष्ठेची ही लढाई आहे. निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे.पूर्वीचा कारी-खानापूर हा गट रद्द होऊन नव्याने उत्रौली-कारी गट तयार करण्यात आला आहे. पूर्वीचा कारी-खानापूर हा संपूर्ण गट शिवाय रायरी गणातील महाड-पंढरपूररोडवरील २५ गावांचा नव्याने समावेश करून सर्वाधिक ८१ गावांचा मिळून गट तयार केला आहे. सुमारे ५४, ८०२ लोकसंख्या आहे. पूर्वीच्या कारी-खानापूर गटावर २००७ सालचा एक अपवाद वगळता काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांचे वर्चस्व राहिले आहे. मात्र गटाच्या फेररचनेत या गटात नव्याने उत्रौली, वडगावडाळ आणि पूर्वीच्या रायरी गणातील २५ गावांचा समावेश करण्यात आल्याने निवडणुकीची बरीच समीकरणे बदलली आहेत. काँॅग्रेसबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत, तर हा गट १० वर्षांनंतर सर्वसाधारण(खुला) झाला आहे. काँग्रेसकडून जिल्हा परिषद सदस्या गीतांजली आंबवले यांचे पती आनंदराव आंबवले, राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषदेचे माजी सभापती रणजित शिवतरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीकडून उमेदवारी न मिळालेले राोहिदास जेधे यांनी शिवसेनेचा भगवा झेंडा खांद्यावर घेतला आहे. तर, भाजपाकडून सुरेश वाडकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. चौरंगी लढत दिसत असली, तरी खरी लढत काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी, अशीच होणार आहे. उत्रौली पंचायत समिती गण नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी राखीव झाला आहे. काँग्रेसकडून अनिल सावले, राष्ट्रवादीकडून श्रीधर किंद्रे, भाजपाकडून अमर बुदगुडे, तर शिवसेनेने शिवाजी बांदल यांना उमेदवारी दिली आहे. कारी गण हा नागरिकांचा मागासप्रवर्ग महिलेसाठी राखीव झाला असून, काँग्रेसकडून रुक्मिणी घोलप, राष्ट्रवादीकडून दमयंती जाधव, तर शिवसेनेने ज्योती बर्डे, भाजपाकडून अलका कंक निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
काँग्रेस, राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेची लढाई
By admin | Updated: February 13, 2017 01:28 IST