पुणे : शहरातील वाहतूकव्यवस्था दिवसें दिवस गंभीर होत आहे. ही वाहतूककोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून त्यासाठी देशभरातील मेट्रो शहरांमध्ये राबविल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती संकलित करण्यात येत आहे. या माहितीसाठी शहर पोलिसांच्या एका समितीने नुकतीच मुंबई शहरातील वाहतूक उपाययोजनांची माहिती घेतली आहे. या माहितीचा अहवाल पुढील आठवड्यात सादर करण्यात येणार आहे. सह पोलीस आयुक्त सुनील रामानंद यांनी या उपाययोजनांसाठी पुढाकार घेतला आहे. शहरातील वाढती वाहनांची संख्या, सार्वजनिक वाहतूकव्यवस्था सक्षम नसल्याने खासगी वाहनांचा वाढता वापर तसेच वाहतुकीला अपुरे पडणारे रस्ते यामुळे शहरातील वाहतुकीची संख्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी पोलिसांकडून कंबर कसण्यात आली आहे. पुणे शहरांप्रमाणेच प्रमुख महानगरांमध्येही वाहतुकीची समस्या जवळपास एकसारखीच आहे. त्या सोडविण्यासाठी उपाययोजना राबविल्या आहेत. त्यांचा अभ्यास करून त्या पुणे शहरासाठी उपयोग करता येईल का, याअनुषंगाने पोलिसांच्या वतीने विशेष पथक तयार करण्यात आले. हे पथक या शहरांमध्ये जाऊन त्या ठिकाणच्या वाहतूक समस्या सोडविण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती तसेच वाहतुकीची सद्य:स्थिती आणि ही समस्या सोडविण्यासाठी वापरण्यात आलेल्या अत्याधुनिक उपाययोजना काय आहेत. याचे संकलन सुरू आहे. या माहितीच्या अहवालावरून शहरातील वाहतूक नियमनासाठी कोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत. त्यानुसार, काय बदल करावे लागतील, याचा आराखडा शहर वाहतूक सुधारणेसाठी करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
शहराची वाहतूककोंडी फुटणार
By admin | Updated: December 8, 2015 00:16 IST