चाकण : ‘सामुदायिक विवाहसोहळे ही काळाची गरज असून, अशा सोहळ्यांमध्ये सर्वसामान्यांचे विवाह होणे अपेक्षित आहे, त्यासाठी गेल्या बावीस वर्षांपासून चाकण येथे सामुदायिक विवाहसोहळा ही चळवळ अखंडपणे राबविणारे या सोहळ्याचे प्रणेते सुरेश गोरे यांचा आदर्श घेण्याची गरज आहे,’ असे मत शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मंगलदास बांदल यांनी येथे व्यक्त केले. मानव विकास कल्याण ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ मंडळी चाकण यांच्यातर्फे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, विद्यमान सदस्य सुरेशभाऊ गोरे यांच्या नेतृत्वाखाली येथील मार्केटयार्डच्या आवारात आयोजित करण्यात आलेल्या मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याप्रसंगी बांदल बोलत होते. या सोहळ्यात एकूण २२ जोडपी विवाहबद्ध झाली. या प्रसंगी भोसरीचे आमदार विलासराव लांडे, राजगुरुनगर बँकेच्या संचालिका हेमलता टाकळकर, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटक विजया शिंदे, खेड पंचायत समितीच्या सदस्या अॅड. अमृता गुरव, शिवसेनेचे तालुका उपप्रमुख पांडुरंग गोरे, चक्रेश्वर पतसंस्थेचे माजी अध्यक्ष भगवान बिरदवडे, उद्योगपती बाळासाहेब जाधव, चाकण पतसंस्थेचे संचालक सुरेश कांडगे, उपाध्यक्ष प्रकाश भुजबळ, उद्योजक संजय पुरी, अशोक जाधव, धीरज केळकर, नितीन गोरे, दत्तात्रय गोरे, ऋषिकेश शेवकरी, निवृत्ती जाधव, अनिल धाडगे, विकास गोरे, रामदास जाधव आदींसह वºहाडी मंडळी, ग्रामस्थ, संयोजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी साखरपुडा, हळदी समारंभ आटोपल्यानंतर वाद्यवृंदांच्या गजरात नवरदेवांची संपूर्ण शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. भव्य-दिव्य सजविलेल्या आकर्षक मंडपात या वेळी बावीस जोडपी विवाहबद्ध झाली. अगदी नियोजनबद्धपणे सोहळा पार पडल्याने या सोहळ्याचे प्रणेते सुरेशभाऊ गोरे यांचे या वेळी कौतुक करण्यात आले. आमदार लांडे यांनीही सुरेश गोरे यांचे कौतुक केले. बाळासाहेब गोरे, नितीन गोरे, विकास गोरे, दत्तात्रय गोरे यांनी स्वागत केले. विवाह सोहळ्याचे प्रणेते सुरेश गोरे यांनी प्रास्ताविक, तर सुदाम कराळे यांनी सूत्रसंचालन केले. संभाजीराजे खराबी यांनी आभार मानले. (वार्ताहर)
चाकणला २२ जोडपी विवाहबद्ध
By admin | Updated: May 29, 2014 04:54 IST