चाकण : शाळा-कॉलजचे दिवस संपले की प्रत्येकजण आपापल्या करिअरसाठी वेगवेगळ्या क्षेत्राकडे धाव घेतो. मात्र, ज्या शाळेमध्ये, ज्या कॉलेजमध्ये आपण शिकलो, लहानाचे मोठे झालो, वेगवेगळ्या भागातील विद्यार्थ्यांबरोबर आपण मैत्रीचे नाते जोडले, ती नाळ मात्र तशीच असते. सर्वांना एकदा भेटावे, एकमेकांशी हितगुज करावे, असे सर्वांना वाटते. मात्र, तीस वर्षांचा मोठा कालखंड लोटल्यानंतर, प्रत्येकजण आपापल्या नोकरी-धंद्यात व्यस्त असल्याने ते सहजासहजी शक्य होत नाही. मात्र, ते अशक्यही नसते. हे चाकणच्या शिवाजी विद्यालयातून १९८६ साली एसएससी उत्तीर्ण होऊन गेलेल्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले. आणि तब्बल तीस वर्षांपूर्वीच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला.ज्या शाळेत आपण लहानाचे मोठे झालो, ज्या मातीने आपल्याला घडवलं, आयुष्य जगण्याचे तंत्र-मंत्र दिले, त्या भूमीत पुन्हा एकदा त्याच सवंगड्यांसह एक डाव पुन्हा मांडण्याची संधी चालून आली ती माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याच्या निमित्ताने ... चाकणच्या शिवाजी विद्यालयामधून १९८५-८६ या शैक्षणिक वर्षात दहावी उत्तीर्ण होऊन बाहेर पडलेले १२० विद्यार्थी एक दोन नव्हे, तर चक्क तीस वर्षांनी पुन्हा एकत्र आले. त्यात २१ विद्यार्थिनींचा सहभाग होता. प्रथमत: सर्वांचे स्वागत करून तीस वर्षांच्या कालावधीत जीवनाच्या प्रवासातून अर्ध्यावर सोडून गेलेल्या २० विद्यार्थ्यांना व देश सीमेवरील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.या मेळाव्यातून माजी विद्यार्थी आज कुठे-काय करताहेत, याची माहिती शाळेच्या नव्या प्रशासनाला मिळाली. यावेळी विद्यार्थ्यांनी बनविलेल्या डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून जुन्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. या कार्यक्रमाचे संयोजन संजय गोरे, संदीप परदेशी, राजेश कांडगे, अतुल वाव्हळ, अनिल सोनवणे, अतुल वाव्हळ, नितीन रासकर, प्रवीण नायकवाडी, दिलीप शेवकरी, संजय जाधव, महानंदा गोरे, माधुरी पाबळकर या माजी विद्यार्थ्यांनी केले.(वार्ताहर)
चाकणला माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
By admin | Updated: November 17, 2016 02:21 IST