लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : नयना पुजारीचे अपहरण आणि खून झाल्यानंतर आयटी क्षेत्रातील अभियंत्यांची ने-आण करणाऱ्या कॅब चालकांची चारित्र्य पडताळणी करून घेणे बंधनकारक करण्यात आले होते. या घटनेनंतर चारित्र्य पडताळणी करून घेण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले होते. सध्या कोणत्याही कॅब चालकाला ही प्रकिया पार पाडावीच लागते. कॅबमध्ये या चालकांचे नाव, छायाचित्र आणि मोबाईल क्रमांक असलेले ओळखपत्र लावणेही बंधनकारक आहे. पुण्यात हिंजवडी, खराडी, चंदननगर, कल्याणीनगर आदी भागांत आयटी कंपन्या आल्यानंतर अभियंत्यांच्या प्रवासासाठी विविध एजन्सीजकडून तसेच खासगी कॅब करारनामे करून घेण्यात आले. या कॅबवरील चालकांचे ग्रामीण भागातील प्रमाण अधिक होते. कॅबवरील चालकांकडून अशा प्रकारचे कृत्य घडू शकेल अशी कोणी कल्पना केलेली नसल्यामुळे चालकांची पार्श्वभूमी, त्यांचे वर्तन, चारित्र्य याविषयी फारसे गांभीर्य त्याकाळात कंपन्यांकडूनही दाखवले गेले नाही. ही घटना घडल्यानंतर मात्र चालकांचे रेकॉर्ड ठेवण्याबाबत गांभीर्याने विचार झाला. पोलिसांनी सर्व एजन्सी आणि खासगी चालकांना त्यांची चारित्र्य पडताळणी बंधनकारक केली. गेल्या काही वर्षात केवळ आयटीच नव्हे तर सार्वजनिक वाहतुकीसाठीही कॅबचा वापर सुरु झाला आहे. यावरील चालकांची चारीत्र्य पडताळणी होते. त्यांच्यावर कोणकोणते गुन्हे दाखल आहेत याची माहिती घेतली जाते. त्यासाठी संबंधिताला पोलीस आयुक्तालयामध्ये अर्ज करावा लागतो. नाममात्र शुल्क भरुन त्यांना चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र दिले जाते. सुरक्षारक्षक तसेच खासगी क्षेत्रातील व्यक्तींसाठी ही पडताळणी बंधनकारक आहे.
कॅबचालकांना चारित्र्य पडताळणी बंधनकारक
By admin | Updated: May 10, 2017 04:08 IST