चाकण : येथील सेवारस्त्याच्या कडेला बिनबोभाट कचरा जाळला जात असल्यामुळे पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना धोका उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रीय महामार्गाजवळील चाकण-मुटकेवाडी दरम्यानच्या सेवारस्त्यालगत सातत्याने होत असलेल्या या प्रकाराची तत्काळ दखल घेण्याची मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक राहुल कांडगे यांच्यासह येथील वाहनचालक, तसेच नागरिकांनी केली आहे.येथील नगरपरिषद हद्दीतील अनेक दुकानदार, हॉटेल व्यावसायिक, भाजीविक्रेते ओला-सुका कचरा रस्त्याच्या कडेला कशाही पद्धतीने आणून टाकतात. कोणाला कसलाच थांगपत्ता लागू न देता, या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी हा कचरा रहदारीच्या व वर्दळीच्या ठिकाणी पेटविला जातो. कचरा टाकणारे बरचसे दुकानदार, हॉटेल व्यावसायिकच या कचऱ्याला आग लावतात. वाऱ्यामुळे ही आग सर्वत्र पसरून संपूर्ण कचरा जळून जातो. या आगीमुळे धुराचे लोट रस्त्यावर पसरून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या आगीत प्लास्टिक, काड्या, कागद यांचे प्रमाण जास्त असते. ओल्या सुक्या कचऱ्याने दुर्गंधी सुटते. हवेमुळे ही आग पसरून संपूर्ण कचरा जळला जातो. आगीच्या शेजारून पेट्रोल, डिझेल, रॉकेल, गॅस यांची अतिज्वलनशील वाहने गेल्यास मोठा धोका उद्भवू शकतो. हिवाळ्यातील धुक्याप्रमाणे राज्य मार्गावर पसरणाऱ्या या कचऱ्याच्या धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शिवाय, धुराच्या प्रचंड लोटांनी समोरील बाजूने येणारे वाहनेही दिसत नसल्याने अपघातांचाही धोका वाढला आहे.
कचरा जाळल्याने प्रदूषणात वाढ
By admin | Updated: November 17, 2016 02:16 IST