केंद्र व राज्य सरकारमध्ये युती करणाऱ्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नेत्यांवरून पिंपरी-चिंचवडमध्ये तू-तू मैं-मैं सुरू आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रेयवादावरून वैयक्तिक द्वेषाचे, विखारी प्रचाराचे राजकारण दोन्ही समविचारी पक्षांना धोकादायक ठरू शकते. अनधिकृत बांधकामांनंतर एचएच्या प्रश्नावरून दोघांत जुंपली आहे. सत्ताधारी राष्ट्रवादीला लक्ष्य करायचे सोडून या दोन पक्षांतील कार्यकर्ते आपापसांतच लढत बसले आहेत. त्यांना शहाणपण येणार कधी, असा खरा प्रश्न आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची एकमुखी सत्ता आहे. महापालिकेच्या स्थापनेपासून काँग्रेस विचाराचे या महापालिकेवर वर्चस्व राहिले आहे. सध्या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हा बालेकिल्ला. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार फटका बसला. आघाडीचे सरकार जाऊन युतीचे सरकार आले. केंद्र, राज्यातील युतीत जशी धुसफूस सुरू आहे. तशीच धुसफूस पिंपरी-चिंचवडमध्ये सुरू आहे. श्रेयवादाचे राजकारण सुरू झाले आहे. वैयक्तिक पातळीवर टीकादोन खासदार, तीन आमदार, एक राज्यसभा सदस्य, एक राज्यमंत्री पद या पिंपरी-चिंचवड शहराला मिळाले आहे. मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे, भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धुसफूस सुरू आहे. हे दोन्ही नेते एकमेकांवर प्रत्यक्षपणे टीका करीत नसले, तरी कार्यकर्त्यांत धुसफूस सुरू ठेवली आहे. अनधिकृत बांधकाम प्रश्नानंतर एचए कंपनीतील खासदार बारणेंच्या सभेवरून भाजपाचे नेते नामदेव ढाके यांनी वैयक्तिकटीका केली. प्रश्न सोडविता येत नसेल, तर राजीनामा द्यावा, असे आव्हान दिले. ढाकेंच्या या टीकेने एचए कामगार, तसेच ढाकेंचे पूर्वाश्रमीचे टाटा कंपनीतील सहकारी यांचे पित्त खवळले आहे. ‘एचए कामगार आंदोलन सुरू असताना भाजपाचे नेते कुठे गेले होते. कामगारांच्या भावनेशी खेळाल तर याद राखा, असा इशारा दिल्याने हा वाद आणखीणच पेटणार असल्याची चिन्हे दिसतात. अनधिकृत बांधकामे प्रश्नावरून शहरात श्रेयवादाचे राजकारण पेटले होते. आता एच. ए. वरून सेना भाजपात जुंपली आहे. विकासासाठी पक्षांत जुपणे ही चांगली गोष्ट आहे. त्यातून प्रश्न सुटले तर ठीक. एचए प्रश्नाबाबत कामगारांच्या भावनांशी खेळणे, दु:खावर मीठ चोळणे योग्य नाही. ज्या व्यक्तीने प्रयत्न केले. त्याचे त्याला श्रेय मिळायलाच हवे. एचए प्रश्नी किंवा अनधिकृत बांधकाम प्रश्न काँग्रेस-राष्ट्रवादीनेही प्रयत्न केले होते. आता सत्तेवर असणाऱ्या भाजपा-सेनेचेही प्रयत्न सुरू आहे. कोणामुळे काय झाले हे या नगरीतील जनता चांगल्या प्रकारे जाणते. त्यामुळे श्रेयवादाचे, वैयक्तिक द्वेषाचे राजकारण दोन्हीही पक्षांना हितावह नाही.बोपखेलवासीयांची टिंगलखडकीतील कार्यक्रमात संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर उपस्थित होते. त्या वेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी बोपखेलचा प्रश्न छेडला असता, याबाबत पालकमंत्र्यांना विचारा, असे उत्तर देऊन आपली जबाबदारी टाळली. याचाच अर्थ या प्रश्नी कोणताही धोरणात्मक निर्णय हे सरकार घेऊ शकत नाही, हे दिसून येते. त्यामुळे बोपखेलवासीयांचा प्रश्न तसाच पडून राहणार आहे.पालिकेत युतीचे काय?सध्याची शिवसेना आणि भाजपा नेत्यांतील अंतर्गत धुसफूस पाहता येत्या महापालिका निवडणुकीत युती होणार नाही, हे स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादीला जोरदार टक्कर देणे अशक्य वाटते. युती न होणे हे राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडणार आहे. त्यामुळे स्वबळावर निवडणूक लढविण्याची भाषा करणाऱ्यांना महापालिकेवर भगवा फडकाविणे अवघड आहे.
भाजपा-शिवसेनेत श्रेयवादाचे राजकारण
By admin | Updated: April 25, 2016 01:39 IST