जुन्नर : माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्र हे वनविभाग व स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून कार्यरत असलेले राज्यातील एकमेव केंद्र आहे. माणिकडोह धरणाच्या लगत हे केंद्र वसलेले आहे. सन २००० सालापासून उत्तर-पुणे जिल्ह्यात बिबट्यांच्या समस्येने डोके वर काढले. २००२ मध्ये वन विभागाने त्यांच्या माणिकडोह येथील रोपवाटिकेच्या क्षेत्रात बिबट निवारा केंद्राची स्थापना केली. आता माणिकडोह गाव येथील बिबट निवारा केंद्रामुळे सर्वत्र परिचित झाले आहे. धरण रस्त्यावर जुन्नरपासून अवघ्या ५ किमी अंतरावर ‘बिबट निवारा केंद्र’ आहे.वन्यप्राणी संघर्षाच्या व्यवस्थापनाचा उत्कृष्ट नमुना म्हणून या केंद्राची वेगळी ओळख बनली आहे. जुन्नर वन विभागाच्या कार्यक्षेत्रात घोड प्रकल्पांतर्गत जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर या चार तालुक्यांचा समावेश होतो. विभागातील जवळपास ५८२ चौरस किमी वनक्षेत्र आहे. हे वनक्षेत्र बिबट्यांच्या निवासासाठी पोषक असल्याने या परिसरात बिबट्यांचा वावर पूर्वापर आहे. जलसिंचनाच्या विविध प्रकल्पांमुळे १९९० नंतर साखर कारखाने उभे राहू लागले. त्यामुळे ऊसलागवड मोठ्या प्रमाणात होऊ लागली. त्यातच वन्यक्षेत्र, निवारा, भक्ष्य कमी होऊ लागल्याने बिबट्याने आपले वस्तीक्षेत्र मानवी वस्तीजवळ ऊसशेती निवडली. बिबट्यांच्या अन्न, पाणी, निवारा, प्रजनन, संरक्षण अशा सर्वच गरजा भागवण्यास ऊसशेती पोषक ठरू लागल्याने वनक्षेत्रातील बिबटे उसाच्या शेतात वास्तव्याला आले. पण, उसाच्या शेतात वास्तव्यास असलेले बिबटे भक्ष्याच्या शोधात जवळपासच्या गावातील मानवी वस्तीत येऊ लागले. देखभालीचा खर्च उचलणे एकट्या वन विभागाला अडचणीचे होते. शक्यच शिवाय, बिबट्यांवरील संशोधन, त्यांच्या वर्तणुकीचा अभ्यास, लोकजागृती व प्रबोधन, प्रशिक्षण अशी इतर कामे करण्याबाबत वन विभागाच्या मर्यादा लक्षात घेऊन शासनाच्या मान्यतेनुसार जानेवारी २००७ पासून निवारा केंद्र देखभालीसाठी ‘वाइल्ड लाइफ एस. ओ. एस.’ सेवाभावी संस्थेकडे हस्तांतरित केले. सध्या डॉ. अजय देशमुख, सहकारी महेंद्र ढोरे केंद्राचे व्यवस्थापन पाहतात.
वन्यप्राणी व माणूस संघर्ष व्यवस्थापनाचा उत्तम नमुना
By admin | Updated: February 15, 2017 01:14 IST