लोकमत न्यूज नेटवर्कदौंड : २१ व्या शतकातील होणाऱ्या वेगवेगळ्या बदलांमुळे पोलिसांपुढे मोठी आव्हाने निर्माण होणार आहेत. तेव्हा या आव्हानांना तोंड देण्यासाठी पोलिसांनी सक्षम व्हावे, असे मत विशेष पोलीस महानिरीक्षक विजयसिंह जाधव यांनी व्यक्त केले.नानवीज (ता. दौंड) येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील सत्र क्र. ३८च्या दीक्षान्त संचलन समारंभात ते बोलत होते. जाधव म्हणाले, ‘‘समाजाचे रक्षण करणे हे पोलिसांचे आद्य कर्तव्य आहे. तेव्हा पोलीस खात्याला काळिमा लागणार नाही, याचा विचार करणे गरजेचे आहे. भविष्यात प्रलोभनाला बळी पडू नका. पोलीस हा समाजाला न्याय देणार आहे. तेव्हा पोलीस होणे हे भाग्याचे आहे, कारण समाजातील प्रत्येक घटनेत पोलीस सहभागी असतो.’’प्राचार्य विजय मगर म्हणाले, की आजपावेतो १२ हजार ७९६ प्रशिक्षणार्थी या केंद्रातून प्रशिक्षत झाले आहेत. प्रशिक्षणार्थींना कायद्याचे प्रशिक्षण देण्याचे महत्त्वाचे काम केले जाते. त्यानुसार व्यायामशाळा, वाचनालय इत्यादी सुविधा प्रशिक्षणार्थींसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. या वेळी पोलिसांनी संचलन केले. त्यानंतर कराटे आणि मलखांब यांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. सीताराम नरके, सुचित्रा तबीब यांनी सूत्रसंचालन केले. शिरीष गांधी यांनी आभार मानले. दीक्षान्त संचलनानंतर ट्रॉफी कॉप एज्युकेशन पात बास्केटबॉल ग्राऊंड प्राचार्य कार्यालयातील सभागृहाचा उद्घाटन मान्यवरांनी केले.
भविष्यात आव्हाने पेलण्यासाठी सक्षम व्हा
By admin | Updated: May 9, 2017 03:32 IST