पुणे- शेततळ्यामध्ये पडून २ वर्षे दहा महिन्यांच्या मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणात शेतकऱ्याला १५ हजार रुपयांचा जामीन हा सत्र न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी मंजूर केला. पोलिसांचा तपास पूर्ण झाला आहे. भा.दं.वि. कलम ३०४ (सदोष मनुष्यवध) लागू होत नाही, त्यामुळे जामीन देण्याची मागणी ॲड. वीरधवल प्रभाकर देशमुख यांनी केली.
बाळासो बाबूराव काकडे (रा. कोथळे, सोंडवस्ती, ता. पुरंदर) असे त्याचे नाव आहे. त्याने ॲड. वीरधवल देशमुख यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला. ३० जून २०२१ रोजी पुरंदर तालुक्यातील कोथळे, सोंडवस्ती येथे हा प्रकार घडला. काकडे याचे शेततळे आहे. लहान मूल अथवा पोहता न येणाऱ्या व्यक्तीचा त्यामध्ये पडून मृत्यूचा धोका आहे, हे माहिती असतानाही कम्पाऊंड करण्यात आले नाही. त्यामध्ये खेळत जाऊन पडल्याने राजवीर या बालकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणात काकडे याला जेजुरी पोलिसांनी अटक केली. न्यायालयीन कोठडीत असताना त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. तपासास सहकार्य करण्याच्या अटीवर न्यायालयाने हा निकाल दिला.