लोकमत न्यूज नेटवर्कभिगवण : ‘आमचा मातीचा भरलेला ट्रक का अडवतोस? तलाव काय तुझ्या बापाचा आहे का?’ असे म्हणून शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत शस्त्राने पाठीवर, हातावर वार केल्याची घटना भादलवाडी येथे घडली. याबाबत भिगवण पोलिसांकडे तक्रार देण्यात आली असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करून आरोपींना गजाआड केले. मातीउपशातून मिळत असलेल्या मुबलक पैशामुळेच वाद वाढत असल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे.रविवारी (दि.७) भादलवाडी येथील तलावातून मातीउपसा करीत असताना हा प्रकार घडला आहे. आमचा ट्रक का अडवतोस, असे म्हणत नानासाहेब गोपीनाथ पवार, अभिजित ज्ञानदेव पानसरे, रणजित मिंड या तिघांनी हनुमंत दादा जाधव याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या वेळी आरोपींनी जाधव याच्या पाठीवर, दंडावर चाकूसारख्या धारदार शस्त्राने वार केले. या मारहाणीत जाधव जखमी झाला. या प्रकरणी भिगवण पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून तिन्ही आरोपींना भिगवण पोलिसांनी अटक केली आहे. तपास भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार नाना वीर करीत आहेत.
मारहाण करून सशस्त्र हल्ला
By admin | Updated: May 10, 2017 03:54 IST