पुणे : पूर्व पुण्याचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी महापालिकेकडून राबविण्यात येणाऱ्या भामा-आसखेड पाणीपुरवठा योजनेतून आळंदी नगर परिषदेस पाणी देण्याबाबतचा प्रस्ताव लांबणीवर पडला आहे. याबाबत नगर विकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी घेतलेल्या बैठकीत पाणी देण्याबाबतचा निर्णय पालकमंत्री गिरीश बापट यांच्याशी चर्चा करून घेण्यात येणार असल्याचे सांगितले.शहराच्या पूर्व भागाला पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिकेस भामा-आसखेड धरणातून सव्वा दोन टीएमसी पाणी मंजूर केले आहे. या पाण्यासाठी महापालिकेकडून टाकण्यात येत असलेली जलवाहिनी आळंदी गावच्या हद्दीतून जात असल्याने त्या बदल्यात आंळदीलाही या योजनेतून पाणी द्यावे, अशी मागणी नगरपरिषद सदस्यांनी केली आहे. या मागणीवर निर्णय घेण्यासाठी आज मुंबईत नगरविकास राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस नगरपरिषद, तसेच महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. या योजनेतील दोन किलोमीटरची जलवाहिनी आंळदी नगर परिषदेच्या हद्दीतून जाते. या जलवाहिनीसाठी जागा हवी असल्यास आळंदीस पिण्याचे पाणी द्यावे अन्यथा जलवाहिनीचे काम होऊ देणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी दिला होता. त्यामुळे अशीच मागणी आज नगर परिषदेकडून केली . (प्रतिनिधी)
आळंदीला पाण्याचा निर्णय लांबणीवर
By admin | Updated: April 24, 2015 03:30 IST