लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पुरंदरमध्ये होऊ घातलेल्या विमानतळाच्या आराखड्याला केंद्रिय संरक्षण मंत्रालय आणि केंद्रिय विमानतळ प्राधिकरणाच्या मुख्यालयाचा अनुकूल अभिप्राय घ्यावा लागणार आहे. त्यासाठी केंद्रिय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या उपस्थितीमध्ये 15 मे रोजी बैठक आयोजित करण्यात येणार आहे. पुरंदरमध्ये दोन हजार ३६७ हेक्टरवर विमानतळ होणार आहे. पुरंदरमधील विमानतळासंदर्भात मुंबईमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे,मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. लष्कराचे दक्षिण मुख्यालय पुण्यामध्ये असल्याने विमानतळाच्या कामाला सुरुवात करण्यापुर्वी संरक्षण मंत्रालयासह विमानतळ प्राधिकरणाचा सकारात्मक अभिप्राय आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले. विमानतळासाठी एक वर्षाच्या आतमध्ये भूसंपादन प्रक्रिया पुर्ण करण्यात येईल. सात गावांसाठी सात उपजिल्हाधिकारी नेमण्यात येणार आहेत. गावठाणे वगळून प्रकल्प राबवण्यात येणार आहे. यासोबतच या भागाचे ‘सोशिओ इकोनॉमी’ सर्वेक्षण करण्यात येणार आहे. संरक्षण मंत्रालय व विमानतळ प्राधिकरणाने अभिप्राय दिल्यानंतर राज्य शासन अध्यादेश काढणार आहे. भूसंपादनासाठी दिलेल्या चार पर्यायांसदर्भातही यावेळी चर्चा करण्यात आली.
विमानतळासाठी हवा संरक्षण मंत्रालयाचा ‘क्लिअरन्स’
By admin | Updated: May 5, 2017 23:55 IST