पुणे : प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) कामकाजातून एजंट हद्दपार करण्यात आले असले, तरी नागरिकांच्या माहितीसाठी कोणतीही सुविधा न करण्यात आल्याने अनेकांची तारांबळ उडत आहे. पहिल्यांदाच आरटीओमध्ये आलेल्या नागरिकांना अर्ज भरण्यापासूनची प्रत्येक गोष्ट कर्मचाऱ्यांना विचारावी लागत असल्याचे बुधवारी पाहायला मिळाले.परिवहन आयुक्तांच्या आदेशानुसार आरटीओ कार्यालयातील एजंटांना पोलिसांच्या मदतीने पुर्णपणे हद्दपार करण्यात आले. यापुर्वी कोणताही अर्ज भरण्यापासून पुढील अनेक कामांसाठी नागरिक एजंटांची मदत घेत होते. नियमित प्रक्रियेपेक्षा थोडे पैसे जास्त देवून बसल्याजागी सगळी कामे होत असल्याने अनेक नागरिकही एजंटांना प्राधान्य देत होते. त्यातच आरटीओ आवारातही नागरिकांच्या माहितीसाठी कोणतेही फलक किंवा स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळेही अनेक जण नाईलाजास्तव एजंटांकडे वळत होते. आरटीओचे बरेसचे काम एजंटांमार्फतच चालत होते. आता एजंटांना हद्दपार केल्याने नागरिकांना अर्ज भरणेही कठीण जात असल्याचे बुधवारी दिसून आले. विविध अर्जातील शासकीय भाषा कळणे नागरिकांना थोडेफार कठीण जात होते. तसेच कोणता अर्ज कुठे भरायचा, शुल्क कुठे जमा करायचे याची माहितीही नसल्याने सातत्याने कर्मचाऱ्यांकडे विचारणा करावी लागली. नागरिकांच्या मार्गदर्शनासाठी कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आरटीओ ही शासकीय यंत्रणा अल्याने कामकाज ठप्प होण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे अधिकारी सांगत आहे. परंतू गुरवारपासून वितरक ही एजंटला पाठिंबा देण्यासाठी कामकाजावर बहिष्कार टाकणार आहेत. यामुळे आरटीओच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच कामकाजावरही ताण येवू शकतो. (प्रतिनिधी)कृती समिती स्थापन आरटीओमधील एजंटांनी एकत्र येऊन कृती समिती स्थापन केली आहे. या समितीचे अध्यक्षपद प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे माजी सदस्य बाबा शिंदे यांना देण्यात आले आहे. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोटार ड्रायव्हिंग स्कूल संघटनेचे राजू घाटोळे, रिक्षा संघटनेने बाबा धुमाळ, प्रसाद जगताप, भारत शेळके यांच्या शिष्ट मंडळाने बुधवारी परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांना मागण्यांचे निवेदन दिले.
एजंट हद्दपार, पण नागरिकांची तारांबळ
By admin | Updated: January 22, 2015 00:45 IST