पुणे : अंत्ययात्रेदरम्यान धक्का लागल्याच्या कारणावरून दोन गटांत गेल्या महिन्यात झालेल्या प्रकरणातील काही आरोपी अद्यापही मोकाट असून, पोलीस दप्तरी फरार असलेले काही सराईत राजरोसपणे शहरात फिरत आहेत. फरासखाना पोलिसांच्या हद्दीतच हे आरोपी फिरत असल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.एका अंत्ययात्रेदरम्यान एकमेकांना धक्का लागल्याच्या कारणावरून दोन गटांत वाद झाला होता. तो मिटविण्यासाठी एकत्र आलेल्या या दोन्ही गटांत हाणामारी झाली होती. याप्रकरणी दोन्ही गटातील तरुणांवर परस्परविरोधी तक्रारींवरून गुन्हा दाखल केला होता. हे फरारी आरोपी शहरात बिनधास्तपणे वावरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यातील असिफ भालदारवर तब्बल १५ गुन्ह्यांची नोंद आहे. मुंबईत मालाड, सांताक्रूझ, साकीनाका, गोवंडी आणि पुण्यातील समर्थ, स्वारगेट, बंडगार्डन, कोंढवा, विश्रामबाग, विश्रांतवाडी व फरासखाना या पोलीस ठाण्यांत हे गुन्हे दाखल आहेत. (प्रतिनिधी)
गुन्ह्यातील फरार आरोपी मोकाटच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2016 00:42 IST