हडपसर : सोलपूर रस्त्यावरील गाडीतळ ते रविदर्शनदरम्यान सायंकाळी साडेसातनंतर खासगी बस रस्त्यात थांबल्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या आणि रस्त्यात थांबणाऱ्या बस, कॅब आणि टेम्पोंवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने उड्डाणपुलावरून आणि उड्डाणपुलाच्या खालून वाहने वेगात येत असतात. मात्र, उड्डाणपूल संपताच खासगी ट्रॅव्हल्सच्या बस थांबत असल्यामुळे वाहतूककोंडीमुळे धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असूनही या प्रकाराकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. वाहनांच्या गर्दीमुळे हकनाक एखाद्याचा बळी जाण्याची भीतीही नागरिकांनी व्यक्त केली. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी रात्री दहाच्या सुमारास ट्रॅव्हल बस आणि ट्रकमध्ये सापडून जुन्या पोस्ट आॅफिससमोर एकाला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर काही दिवस परिस्थिती सुधारल्याचे चित्र होते; मात्र पुन्हा जुने पोस्ट आॅफिस ते आकाशवाणीदरम्यान प्रवासी मिळविण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्सच्या बस रस्त्यात थांबलेल्या असतात. ट्रक, टेम्पो आणि इतर वाहनांवर वाहतूक पोलीस कारवाई करताना दिसतात; मात्र या ट्रॅव्हल्सवर कारवाई का करीत नाहीत, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. (वार्ताहर)टेम्पो आणि कॅबही राहतात उभ्या४रविदर्शनसमोर एसटी महामंडळाने थांबा केलेला असला, तरी तेथेही खासगी ट्रॅव्हल्सच्या बसबरोबर टेम्पो आणि कॅबही रात्री उशिरापर्यंत प्रवासी मिळविण्यासाठी थांबलेल्या असतात. हा प्रकार सर्रास सुरू असला, तरी त्याकडे हडपसर पोलीस ठाणे आणि वाहतूक पोलीसही का दुर्लक्ष करतात, याचे उत्तर गुलदस्तात आहे. ४एसटी महामंडळाच्या थांब्यावर खासगी ट्रॅव्हल्सच्या बसना परवानगी कशी देतात? एसटी महामंडळाकडून त्यांच्यावर का कारवाई केली जात नाही? एसटी महामंडळाच्या बसचा थांबा सोडून बस दुसरीकडेच थांबतात; त्यामुळे प्रवासी बुचकळ्यात पडत आहेत. ४एसटी बस चुकल्यामुळे नाइलाजाने महागड्या खासगी ट्रॅव्हल बसचा नागरिकांना आधार घ्यावा लागत आहे. बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांची खासगी ट्रॅव्हल्सकडून लूट होत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी बसथांब्याचे नियोजन करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
खासगी बसमुळे अपघाताचा धोका
By admin | Updated: March 21, 2015 00:15 IST