महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून राबविल्या जात असलेल्या भरती प्रक्रियेत गैरप्रकार होत असल्यामुळे हे पोर्टल बंद करावे,अशी मागणी सातत्याने केली जात होती. त्यानुसार महाविकास आघाडी सरकारने महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबविण्याऐवजी सुधारित पद्धतीने भरती राबवण्याचा निर्णय घेतला. तसेच ‘महाआयटी’द्वारे सरळसेवा भरती प्रक्रियेसाठी खासगी कंपन्या नियुक्त करण्याची प्रक्रिया राबवण्यात आली.परंतु,बराच काळ ही प्रक्रिया रखडली होती. अखेर सामान्य प्रशासन विभागाने अध्यादेश प्रसिध्द करून चार कंपन्यांना मान्यता दिल्याचे जाहीर केले.त्यात अॅप्टेक लिमिटेड, जीए सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड, जिंजर वेब्ज प्रायव्हेट लिमिटेड आणि मेटा आय टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांचा समावेश आहे. सुधारित पद्धतीनुसार भरती प्रक्रियेतील परीक्षा घेण्यासाठी मान्यता देण्यासाठी कंपन्यांची निवड व्हावी, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आल्याचे मनविसेतर्फे कळविण्यात आले आहे.
सरळसेवा भरतीच्या प्रक्रियेला मिळाली गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:16 IST