पुणे : महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या २६६४ उमेदवारांपैकी ७५१ जणांनी माघार घेतली, तर ४१८ जणांचे अर्ज छाननीमध्ये बाद झाले आहेत. त्यामुळे आता १६२ जागांसाठी १०७६ उमेदवारांमध्ये लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पक्षाच्या विरोधात बंडखोरी केलेल्या अनेकांना उमेदवारी मागे घेण्यास लावून त्यांचे बंड शमविण्यात राजकीय पक्षांना यश आले आहे. मात्र काही ठिकाणी बंडखोरी कायम राहिली आहे.बंडखोरी रोखण्यासाठी भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व मनसे यांसह सर्वच पक्षांकडून प्रयत्न करण्यात येत होते. काही ठिकाणी त्याला यश आले तर काही ठिकाणी बंडखोरी कायम राहिली आहे. प्रभाग ३२ मध्ये काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराने तर प्रभाग ९ मधील मनसेच्या अधिकृत उमेदवाराने माघार घेतली. बंडखोरांना पक्षामध्ये विविध पदांची आमिषे दाखविण्यापासून ते काही ठिकाणी ‘अर्थपूर्ण’रीत्या समजूत घालण्याचे प्रकारही झाले. वरिष्ठ नेत्यांना फोन लावून देऊन समजूत घालण्याचा प्रयत्न गेल्या दोन दिवसांपासून होत होता. त्याला अनेक ठिकाणी यश मिळाले. यंदाची निवडणूक ही प्रभाग पद्धतीने होत आहे. त्यामुळे अपक्षांना निवडणूक लढविणे जड जाणार आहे. त्याचे प्रत्यंतर माघारीमध्ये झाले. मात्र, तरीही काही अपक्षांनी पक्षाविरुद्धचा राग व्यक्त करण्यासाठी उमेदवारी अर्ज भरले होते. राजकीय चुरस मोठी असल्याने अगदी थोडक्या मतांनीही निकाल बदलू शकतो. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज ठेवू नयेत, यासाठी प्रयत्न झाले. (प्रतिनिधी)
निवडणुकीच्या रिंगणातून ७५१ जणांची माघार
By admin | Updated: February 8, 2017 03:31 IST