लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : केंद्रीय पथकाने पाहणी केल्यानंतरही अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील आणखी ४३ कोटी रुपये सरकारने अजून दिलेले नाहीत. कृषी विभागाने राज्य सरकारकडे याची मागणी केली आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीत जिल्ह्यातील २ लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यांचे पंचनामे करण्यात आले. त्यानंतर शेतमाल आणि जमिनीच्या नुकसानीपायी ८७ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. यातल्या ४४ कोटी रुपयांचे वाटप नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना झाले आहे.
कृषी, तसेच महसूल विभागाच्या तालुका तसेच जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे त्वरित पाहणी करून नुकसानीचे पंचनामे तयार केले. राज्याकडून दिवाळीनंतर ४४ कोटी रुपये पाठवले. शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन महसूल प्रशासनाने त्याचे वाटप केले. मात्र, ते पूर्ण करता आलेले नाही.
सरकारी नियमाप्रमाणे दोन हेक्टरसाठी नुकसानभरपाई मिळते. जिरायती व बागायतीला हेक्टरी १० हजार व फळपिकाच्या नुकसानीला हेक्टरी २५ हजार रुपये मदत मिळते. रक्कम अपुरी आल्याने प्रशासनाने सर्वच नुकसाग्रस्त शेतकऱ्यांना एक हेक्टरसाठीच मदत दिली आहे. पुढची रक्कम मिळाल्यानंतर दुसऱ्या हेक्टरचे वाटप करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
असे आहे जिल्ह्यातील नुकसान
जिरायती- २४ हजार ४७० हेक्टर
बाधित शेतकरी- ७३ हजार १३५
बागायती- ४८ हजार ८४० हेक्टर
बाधित शेतकरी- १ लाख १५ हजार ६७६
फळपिकांचे नुकसान -४ हजार ८४८ हेक्टर
बाधित शेतकरी- ९ हजार ९२७
जमिनीचे नुकसान -९१९ हेक्टर
बाधित शेतकरी - ४ हजार ३९३
जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकरी -१ लाख ९८ हजार ७१८
मदतीसाठी एकूण निधीची मागणी - ८७ कोटी रूपये
प्राप्त निधी -४४ कोटी
मदतीचा लाभ मिळालेले शेतकरी -१ लाख
मदतीच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी -९८ हजार ७१८.