पवनानगर : पवना बंद जलवाहिनीला विरोध कायम असून, प्रकल्प रद्द होईपर्यंत लढत राहणार आहोत. आता बंद जलवाहिनीला विरोध करणाारे राष्ट्रवादीचे नेते त्या वेळी कोठे होते? सत्तेत असताना एक व विरोधी पक्षात असताना एक, असे खोटे राजकारण मावळची जनता सहन करणार नाही, असे आमदार बाळा भेगडे यांनी सांगितले. पिंपरी-चिंचवड शहरासाठी पवना धरणातून नेण्यात येणाऱ्या बंद जलवाहिनी विरोधातील आंदोलनात ४ वर्षांपूवी ९ आॅगस्टला मुंबई-पुणे दु्रतगती महामार्गावर रास्ता रोको केले होते. त्या वेळी कांताबाई ठाकर, मोरेश्वर साठे, श्याम तुपे हे तीन शेतकरी मृत्युमुखी पडले होते. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येथील एका मंगल कार्यालयात रविवारी शोकसभेचे आयोजन केले होते. त्या वेळी आमदार भेगडे बोलत होते.ते म्हणाले, ‘‘सरकारने शब्द देऊन तीन वर्षांत मृतांच्या नातेवाइकांना नोकऱ्या दिल्या नाहीत. शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले. भाजपा-सेना सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी या कुटुंबातील नातेवाइकांना नोकरीत घेण्यासाठी आदेश काढला आहे. शेतकऱ्यांचे गुन्हे मागे घेण्यासाठी शासन सकारात्मक आहे आणि ते मागे घेतले जातील. कांताबाई ठाकर या नितीनच्या एकट्याच्या आई नसून, पाण्याच्या लढ्यासाठी त्याचे बलिदान गेले आहे. त्यामुळे त्या मावळच्या आई आहेत. या शहिदांचे पुण्यस्मरण हे प्रत्येक वेळी करण्यात येईल.’’या वेळी मावळचे माजी सभापती व पवना बंद जलवाहिनी आंदोलनाचे नेते ज्ञानेश्वर दळवी म्हणाले, ‘‘पाणी हे मावळचे वैभव असून, कोणालाही कदापि बंद जलवाहिनीने नेऊ देणार नाही.’’ या वेळी बाळासाहेब घोटकुले, रामनाथ वारिंगे, भास्करराव म्हाळसकर, लक्ष्मण भालेराव, शांताराम भोते आदींची भाषणे झाली. या वेळी ज्येष्ठ नेते केशवराव वाडेकर, गुलाबराव वरघडे, पांडुरंग ठाकर, गणेश गायकवाड, रघुवीर शेलार, प्रशांत ढोरे, सुकन बाफना अमित कुंभार, किसन खैर उपस्थित होते. (वार्ताहर)
‘जलवाहिनी प्रकल्प बंद होईपर्यंत लढा’
By admin | Updated: August 10, 2015 02:50 IST