अंगद राठोडकर, दिघी टप्प्याटप्प्याने सुरू असलेले रस्ता रुंदीकरणाचे काम व पुण्याच्या दिशेने टाकण्यात येणाऱ्या जलवाहिनीच्या कामामुळे रस्ता अरुंद झाला आहे. आळंदी शहराजवळचे बाह्यवळणाचे रस्ते सुरू न होता तसेच प्रलंबित राहिल्याने पुणे - आळंदी रस्त्यावर नित्याची होणारी वाहतूककोंडी ही वाहनचालक व नागरिकांना त्रासदायक आणि जीवघेणी ठरत आहे. या बाह्यवळण रस्त्याची भूसंपादन प्रक्रियाच रखडल्यामुळे हे रस्ते होणार कधी, हा प्रश्न या परिसरातील नागरिकांना पडला आहे. आळंदी शहराकडे वाहनांची वर्दळ नेहमीचीच आहे. शहराकडे जाण्यासाठी पुणे-आळंदी हा एकच मार्ग वाहतुकीसाठी वापरात आहे. आळंदीकडे जाण्यासाठी बाह्यवळण रस्ते हा पर्याय शिल्लक असला, तरी आळंदी नगरपालिकेची उदासीनता, नागरिकांचे असहकार्य यांमुळे येथील भूसंपादन प्रक्रियाच रखडली आहे. बाह्यवळण रस्ते उपलब्ध नसल्यामुळे पुणे-आळंदी या एकाच रस्त्यावर वाहतुकीचा प्रचंड ताण पडतो. त्यात पुन्हा आळंदी शहरातील रस्तेही कमालीचे अरुंद आहेत. त्यामुळे आळंदी शहरात झालेल्या वाहतूककोंडीचा ताण हा थेट पुणे-आळंदी रस्त्यापर्यंत पोहोचतो. ही वाहतूककोंडी पुणे -आळंदी रस्त्यावर प्रभाव पाडत असल्याने तासन्तास कोंडी होताना दिसते.
वाहतूककोंडीने वाढले अपघात
By admin | Updated: September 4, 2015 02:10 IST