पिंपरी : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी पूर्वीचे सरकार जबाबदार आहे. तेव्हाच्या मंत्र्यांनी शेतकरी व जेनतेऐवजी आपल्या परिवाराचा विचार केला. त्यामुळेच आधीच्या सरकारला जनेतेने झाडूने साफ केले. आज तेच आंदोलन करत फिरत आहेत. राज्यात ५० टक्के सिंचन होत नाही, तोपर्यंत शेतक-्यांच्या आत्महत्या थांबू शकणार नाहीत, असे स्पष्ट मत केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित भाजपच्या दोन दिवसीय राज्य कार्यकारिणी अधिवेशनाचे उद्घाटनप्रसंगी गडकरी बोलत होते.ते म्हणाले, ‘‘आतापर्यंत वातानुकूलित गाड्यामध्ये फिरणारे आणि त्याच्या काचा कधीही खाली न करणारे आज उन्हातान्हात आंदोलन करत फिरत आहेत. ‘‘काय होतास तू काय झालास तू’’ अशी त्यांची अवस्था झाली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सत्तेतून उन्माद आला होता. त्यामुळेच जनतेने त्यांना झाडूने साफ केले. त्यांनी जे केले, तेच आम्ही केले तर जनतेचा आपल्यावरील विश्वास उडून जाईल. त्यामुळे उन्माद न येऊ देता संकल्प करून कामे करा, असा सल्ला त्यांनी पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिका-यांना दिला.’’ (प्रतिनिधी)
पूर्वीच्या सरकारमुळेच आत्महत्या
By admin | Updated: April 27, 2017 04:53 IST