पिंपरी : साहित्य संमेलन पिंपरी-चिंचवडला होणार की बारामतीला, या चर्चेवर रविवारी सायंकाळी पडदा पडला. सांस्कृतिकनगरीकडे वाटचाल करणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहराला ८९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्याचा मान मिळाला आहे. शारदेचा उत्सव पिंपरी-चिंचवडमध्ये, अशी घोषणा होताच साहित्य वर्तुळात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. साहित्य महामंडळाच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. न भूतो न भविष्यती असे संमेलन करू, असा आत्मविश्वास शहरातील विविध संस्थांचे प्रमुख आणि साहित्यविश्वातील मान्यवरांनी व्यक्त केला.गेल्या तीन वर्षांपासून पिंपरी-चिंचवडमधील सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था साहित्य संमेलन घेण्यास इच्छुक होत्या. मात्र, साहित्य महामंडळापुढे योग्य भूमिका मांडली न गेल्याने दोन वर्षांपूर्वी हे संमेलन आचार्य अत्रेंच्या भूमीत गेले होते. त्यानंतर गेल्या वर्षी संत नामदेवमहाराजांच्या भूमीत घुमान येथे संमेलन झाले. त्यानंतर आगामी ८९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार, याबाबत उत्सुकता होती. राज्यभरातून सातारा, उस्मानाबाद, नर्सी (नामदेव), जि. हिंगोली, श्रीगोंदा, उस्मानाबाद, पिंपरी-चिंचवड अशी ११ निमंत्रणे आली होती. त्यात बारामती की पिंपरी-चिंचवड ही दोन शहरे प्रबळ इच्छुक असल्याचे दिसून आले. त्यामुळे बारामती की पिंपरी, अशी चर्चा रविवारी दिवसभर होती. याबाबतचा निर्णय सायंकाळच्या बैठकीत होणार असल्याने कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार, याबाबत उत्सुकता होती. संमेलनासाठी केवळ आर्थिक निकषपुणे : ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राज्यातून १२ निमंत्रणे आली, तरी केवळ तीन संस्थास्थळांची महामंडळाने पाहणी केली. गेल्या वर्षीप्रमाणेच याही वर्षी मोजक्याच संमेलन स्थळांना भेटी देऊन इतर संस्थांवर अन्याय केल्याची भावना उमटू लागली असून, महामंडळाच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजीचा सूर आहे. संमेलनाच्या आयोजनासंदर्भात मराठवाडा साहित्य परिषद, उस्मानाबाद, एज्युकेशन सोसायटी, नायगाव बाजार, नांदेड, महाराष्ट्र साहित्य परिषद, शाहुपुरी, सातारा, पिंपरी-चिंचवड कलारंग प्रतिष्ठान, चिंचवड, कर्नाटक राज्य मराठी परिषद, भालकी, गुलबर्गा, महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, आकुर्डी, चिंचवड, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटी, पिंपरी, महाराष्ट्र साहित्य परिषद, बारामती, मराठवाडा साहित्य परिषद, हिंगोली, आग्री युथ फोरम, डोंबिवली, अक्षरमानव संघटना, श्रीगोंदा, अहमदनगर, मराठी वाङ्मय मंडळ, अंमळनेर या ठिकाणांचा समावेश होता. परंतु महामंडळाकडून या १२ ठिकाणांमधील केवळ श्रीगोंदा, डोंबिवली आणि पिंपरी येथील डी. वाय. पाटील या तीन ठिकाणांचीच पाहणी झाली करण्यात आली. त्यावरुनच संमेलनाचे ठिकाण निश्चित करण्यात आले. अशा प्रकारे इतर ठिकाणांची पाहणी न करता केवळ तीन स्थळांची पाहणी करुन संमेलन स्थळ निश्चित करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न पुन्हा एकदा साहित्य वर्तुळातून उपस्थित करण्यात आला आहे.दर वर्षी अशा प्रकारे ठरावीक ठिकाणांची पाहणी करुन एखादे ठिकाण निश्चित करण्यात येते. यामध्ये कोणते निकष लक्षात घेतले जातात, याविषयी शंका उपस्थित होताना दिसत आहे. या वेळी इतर ठिकाणे नाकारण्यामागे वेगवेगळी कारणे असून, ती सांगणे शक्य नसल्याचे अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी पत्रकार परिदेत सांगितले. केवळ आर्थिक सक्षमता हेच संमेलन स्थळ ठरविताना केंद्रस्थानी आहे का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शरद पवार अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत असल्याने बारामतीमध्ये साहित्य संमेलन व्हावे, अशी बारामतीकरांची इच्छा होती. परंतु बारामतीला नुकतेच युवा साहित्य संमेलन झाल्याने पर्याय नाकारण्यात आल्याचे डॉ. वैद्य यांनी सांगितले. डी. वाय. पाटील संस्थेकडे संमेलनाचा मान गेल्याने आर्थिक गणिते सोपी होण्याची शक्यता असल्याचे चिन्ह साहित्य वर्तुळात आहे. (प्रतिनिधी)
उद्योगनगरी भारावली
By admin | Updated: August 10, 2015 02:52 IST