मंचर : आंबेगाव तालुक्यात अनेक शेतकर्यांनी टोमॅटोची अगाद (लवकर) लागवड केली आहे. नुकत्याच लागवड झालेल्या टोमॅटोला वाढत्या उष्णतेचा फटका बसत असून, मर होण्याचे प्रमाण वाढत आहे. टोमॅटोचे पीक जगविण्याचा अटापिटा शेतकर्यांना करावा लागत आहे. नगदी उत्पन्न मिळवून देणार्या टोमॅटो पिकाने दोन वर्षांपासून शेतकर्यांना चांगले पैसे मिळवून दिले आहेत. विशेषत: लवकर लागवड केलेल्या टोमॅटोला हमखास बाजारभाव मिळतो, असा शेतकर्यांचा अनुभव आहे. त्यामुळे टोमॅटोची अगाद लागवड केली जाते. पूर्वी घरी रोपे टाकून लागवड केली जायची. आता मात्र रोपवाटिकेतून तयार रोपे आणून टोमॅटोची लागवड केली जाते. मे महिन्यात लागवड मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसते. वातावरणात जास्त प्रमाणात उष्णता आहे. दिवसभर प्रखर ऊन असते, त्याचा परिणाम टोमॅटोपिकावर जाणवू लागला आहे. नुकतीच लागवड केलेल्या टोमॅटो रोपांची मर होऊ लागली आहे. अती उष्णतेने रोपांची मर वाढली असून, वाढ व्यवस्थित होत नाही. त्याचप्रमाणे अळी व रसशोषण करणार्या किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. या वातावरणात टोमॅटो पिकाचा निभाव लागणे अवघड आहे. ते जगविण्यासाठी शेतकर्यांची धडपड सुरू आहे. शेतकर्यांनी टोमॅटोपिकासाठी ठिंबक सिंचन केले आहे. तसेच पिकाला वारंवार पाणी द्यावे लागते. शेतकर्यांना महागड्या औषधांची फवारणी करावी लागते. फोटोओळी : तीव्र उष्णतेचा फटका नवीन लागवड झालेल्या टोमॅटोपिकाला बसत असून, मर होण्याचे प्रमाण वाढले आहे.
टोमॅटोच्या लागवडीला उष्णतेचा फटका
By admin | Updated: May 7, 2014 04:25 IST