संजय माने, पिंपरीशहर काँग्रेसने ‘काँग्रेस आपल्या दारी’ उपक्रम घेतला. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचे उद्घाटन झाले. आगामी महापालिका निवडणुकीची नांदी समजल्या जाणाऱ्या काँग्रेसच्या या कार्यक्रमात अन्य पक्षांतून काहींनी जाहीर प्रवेश केला. अन्य पक्षांतून अनेक जण काँग्रेसमध्ये प्रवेश करताहेत, ही स्वागतार्ह बाब आहे; परंतु एकीकडे त्यांचे स्वागत करत असताना, दुसरीकडे स्वकीयांची मनधरणी करण्याची वेळ आली आहे.काँग्रेस पक्षाची २०१२च्या महापालिका निवडणुुकीत पीछेहाट झाली. तब्बल २९ जागा काँग्रेसला लढविता आल्या नाहीत. २०१७च्या निवडणुकीत काँग्रेसवर अशी नामुष्की ओढवू नये, म्हणून आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत नुकताच कार्यक्रम झाला. प्रदेशाध्यक्षांच्या कार्यक्रमाला माजी शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्यासह एक गट अनुपस्थित राहिला. शिवाय काही पदाधिकारी, नगरसेवक गैरहजर राहण्याचे धाडस दाखविले याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. पक्षांतर्गत गटबाजीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांची गळचेपी होत होती. गटबाजी दूर व्हावी, नव्या नेतृत्वाला संधी मिळावी, यासाठी पक्षश्रेष्ठींनी सचिन साठे यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. बदल केल्यानंतरही पदाधिकारी, काही नगरसेवक यांची हेकेखोर वृत्ती जैसे थे आहे. पक्षापेक्षा, पक्षश्रेष्ठींपेक्षा आपण कोणी तरी मोठे आहोत, अशी त्यांची भावना झाली. त्यातून गटबाजीचे प्रदर्शन घडू लागले आहे. अन्य पक्षांतून येणाऱ्यांचे सन्मानाने स्वागत केले जात असताना, पक्षातील कोणी बाहेर जाणार नाही या दृष्टीने अधिक प्रयत्न होणे गरजेचे आहेत.
बाहेरच्यांना प्रवेश, स्वकीयांची मनधरणी
By admin | Updated: September 22, 2015 03:10 IST