पिंंपरी : अचानक आलेल्या अवकाळी पावसाने बुधवारी दुपारी नागरिकांची चांगलीच ताराबंळ उडाली. पावसाने रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. पावसामुळे उष्णता कमी होऊन वातावरणात गारवा निर्माण झाला.मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तापमानाचा पारा ४१ अंशावर पोहचला. मात्र, गेल्या चार दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाला. बुधवारी पुन्हा वातावरणात अचानक बदल होऊन दुपारी अडीचच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. पिंपरीतील भाजीमंडईत विक्रेत्यांची आणि ग्राहकांचीही धावपळ झाली. जोरदार सरी बरसू लागल्याने विक्रेत्यांची उघड्यावर ठेवलेल्या भाजीपाला उचलताना दमछाक झाली. तर खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनी पावसापासून वाचण्यासाठी मिळेल त्या ठिकाणी आसरा घेण्याचा प्रयत्न केला. तसेच रस्त्यावरील दुचाकी वाहनधारकांनी रस्त्याशेजारीच वाहने उभी करून परिसरातील दुकानांच्या छताखाली आश्रय घेताना दिसून आले. रस्त्यावर पावसाच्या डबकी साचल्यामुळे त्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली. तसेच काही ठिकाणी झाडांच्या फांद्याही तुटून पडल्या. पावसात दुचाकी घसरून किरकोळ जखमी होत होते. (प्रतिनिधी)
अवकाळीने उडाली तारांबळ
By admin | Updated: May 12, 2016 01:12 IST