लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : विवाह समारंभावेळी दुचाकी,चारचाकी वाहने येत असतात, त्या वेळी मंगल कार्यालयाजवळच्या रस्त्यावर वाहतूककोंडी होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना वाहतूक शाखेने दिल्या मात्र त्याबाबतच्या उपाययोजना केल्या नसल्याने मंगल कार्यालय चालकांवर खटले दाखल करण्यात आले आहेत. ४३ मंगल कार्यालयांना नोटीस पाठविण्यात आल्या आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र भामरे यांनी दिली.वाहतूक शाखा परिमंडळ तीन अंतर्गत मंगल कार्यालयातील समारंभामुळे रस्त्यावर होणाऱ्या वाहतूककोंडीस कारणीभूत धरून सांगवीतील कापसे आणि थोपटे लॉन्सच्या चालकांवर भारतीय दंड संहिता २८३ कलामानुसार दखलपात्र गुन्हे दाखल केले आहेत. मंगल कार्यालय व्यवस्थापकांनी वाहतुकीला अडथळा होणार नाही, याची दक्षता घेणे गरजेचे आहे. तसेच पुरेसी वाहनतळ व्यवस्था उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. वाहतूक नियमनासाठी मंगल कार्यालयांनी त्या ठिकाणी कर्मचारी नेमावेत. अशा सूचना दिल्या असताना, दखल घेतली जात नाही. त्यामुळे कारवाईचे पाऊल उचलले असे भामरे यांनी सांगितले.
मंगल कार्यालय चालकांवर खटले
By admin | Updated: May 7, 2017 03:05 IST