आळंदी : पवित्र इंद्रायणीच्या घाटावर जमलेला ९ हजार ३३ तबला व मृदंगवादकांचा अनोख्या ‘नादब्रह्मा’ची अनुभूती रविवारी आली. कर्णमधुर नाद, घाटावरचे नयनरम्य दृश्य पाहून अलंकापुरीच्या घाटावर भक्तीचा मेळा जमल्याची अनुभूती हजारोंच्या संख्येने जमलेल्यांना येत होती. हा सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला. निमित्त होते पखवाज व मृदंगवादकांच्या संमेलनाचे. माईर्स एमआयटी, अखिल भारतीय मृदंगाचार्य संघटना आणि श्रीक्षेत्र आळंदी, देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हे पहिलेच संमेलन भरविण्यात आले होते. आर्ट आॅफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर हे प्रमुख पाहुणे म्हणून होते़ अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कीर्तनकार हभप बाबामहाराज सातारकर, थोर आध्यत्मिक गुरू स्वामी परिपूर्णांनंद, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, पद्मश्री प्रा. डॉ. येल्ला व्येंकटश्वरा राव, ख्यातनाम बासरीवादक अमित काकडे हे विशेष सन्माननीय पाहुणे व्यासपीठावर विराजमान होते. वेदब्रम्हऋषी किसन महाराज साखरे, अखिल भारतीय मृदंग संमेलन अध्यक्ष पं़ उद्धवराव आपेगावकर -शिंदे, रामेश्वरशास्त्री महाराज, प्ऱ ल़ गावडे, प्रकाशमहाराज बोदले आदि उपस्थित होते़ श्री क्षेत्र आळंदी येथील विकासकामांची पूर्तता आणि विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक-अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याचे औचित्य साधून या ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.श्री़ श्री़ रवीशंकर म्हणाले, ही एक ऐतिहासिक घटना आहे़ जगात पहिल्यांदाच असा उपक्रम होत आहे़ मन आणि बुद्धी पवित्र करायची असेल, तर अशा प्रकारचे वादन झाले पाहिजे़ शब्द हे ईश्वर आणि मानवतेला जोडण्याचे काम करतात़ पखवाजवादी म्हणजे मुख्य वादी असतात़ मृदंग हा मन आणि बुद्धीला घडविण्याचा मोठा मार्ग आहे़ हा संदेश संपूर्ण भारतभर दिला जाईल़ ज्ञान, ध्यान आणि आराधना याचा संगम झाला तर सर्वागिण विकास होतो़ स्वामी परिपूर्णानंद म्हणाले, पुणे म्हणजे पुण्य़ यामध्ये भूमीत संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यासारख्या लोकपुरुषांनी या भूमीत जन्म घेतल्याने महाराष्ट्रात जन्म घेणे अत्यंत महत्व आहे़ आळंदी हे आनंद देणारे ठिकाण आहे़ बाबामहाराज सातारकर म्हणाले, संतांच्या सोबती राहिल्यानंतर त्याच्याकडून वेगळा आर्शिवाद मागण्याची गरज नाही़ तो आपोआपच मिळतो़ आळंदीमध्ये वारकरीच काय येथील दगड विटाही वंदनीनय आहेत़ राहुल कराड यांनी प्रास्ताविक केले . याप्रसंगी गरीब व होतकरू पखवाजवादक वारकरी विद्यार्थ्यांना विश्व शांती केंद्राच्या वतीने ७५ पखवाज भेट म्हणून देण्यात आले. यातील प्रातिनिधिक स्वरूपातील पखवाज आळंदी येथील ज्योतिराम काटे या बालवारकऱ्याला देण्यात आला. अखिल भारतीय पखवाज व मृदंग संमेलनाच्या निमित्ताने भारतातून ज्ञानेश्वरीच्या जेवढ्या ओव्या आहेत तेवढेच ९ हजार ३३ मृदंग व पखवाजवादकांनी एकाच मंचावर येऊन आपली सेवा सादर केली. पदश्री प्रा़ डॉ़ येल्ला व्यंकेटेश्वरा राव यांनी मृदंगवादन केले़ नादब्रह्माची अनुभूती देणारा हा एक अलौकिक सोहळा असेल. वारकरी संप्रदायामध्ये पखवाज, मृदंग, वीणा व टाळ या वाद्यांना विशेष महत्त्व आहे. या मृदंग संमेलनात भाग घेणाऱ्या मृदंगाचार्यांना माऊली व जगद्गुुरूंची प्रतिमा असलेली शाल, माऊलींची प्रतिमा, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.(वार्ताहर)
नादब्रह्माची अनुभूती देणारा सोहळा
By admin | Updated: February 8, 2016 01:55 IST