पिंपरी : युती, आघाडीबाबत राजकीय पक्षांमध्ये वरिष्ठ पातळीवर चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. युती, आघाडीबाबतचा निर्णय अद्याप होत नसल्याने कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. युती, आघाडीच्या निर्णयावर अनेकांचे निवडणूक कधी, कोणत्या पक्षातून लढायची हे अवलंबून आहे. युती,आघाडी निश्चितीनंतर त्यांना निर्णय घ्यावयाचा असल्याने सद्य:स्थितीत त्यांची संभ्रमावस्था आहे. निवडणुकीपल्लर्वी पिंपरी-चिंचवड शहरात राजकीय वातावरण ढवळून निघेल अशा घडामोडी घडल्या आहेत. कोणत्या राजकीय पक्षातून निवडणूक लढणे सोईस्कर होईल, याचे अनेकांनी आडाखे बांधले आहेत. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आपल्या निकटवर्तीयांना वेगवेगळ्या पक्षात राहण्याचे सल्ले दिले आहेत. गावकी- भावकी, नात्या-गोत्याचे राजकारण नेहमीच केले जाते. त्यामुळे या वेळी फेब्रुवारीत होणाऱ्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नात्या- गोत्याच्या राजकारणाचा काहींना फटका बसणार आहे, तर काहींना फायदा होणार आहे. युती, आघाडीबाबत निर्णय होत नसल्याने निवडणूक लढण्याचे नेमके धोरण काय निश्चित करायचे, या विवंचनेत कार्यकर्ते आहेत. काहींना युती- आघाडी नको, तर काहींचा त्यासाठी आग्रह आहे. (प्रतिनिधी)
युती, आघाडीबाबत संभ्रम
By admin | Updated: January 23, 2017 03:04 IST