पालम : तालुक्यातील ग्रामीण भागात यावर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने तुरीचे पिक उधळून गेले होते. उरलेल्या पिकाचा काढणीचा खर्च परवडत नसल्याने शेतकरी वर्ग पारंपारिक पद्धतीने खळे करून पीक पदरात पाडून घेत आहेत.
पालम तालुक्यातील रबी हंगामात तुरीचे पीक नगदी पीक म्हणून ओळखले जाते. या पिकावर शेतकऱ्यांचे बहुतांश अर्थिक व्यवहार अवलंबून असतात, पण या वर्षी तुरीच्या पिकाने शेतकऱ्यांना दगा दिला. तूर वाढीच्या काळात सतत अतिवृष्टी झाल्याने जास्त पाणी होऊन पिक जागेवरच वाळून व काही ठिकाणी उधळून गेले होते. त्यामुळे ८० टक्के पिकाचे नुकसान झाले. कसेबसे उरलेले पीक कापणी व काढणीचा खर्च पेलावणे अवघड बनले आहे. त्यामुळे शेतकरी कमी खर्चात पीक काढणीचा पर्याय वापरत आहेत. पारंपारिक पद्धतीने तूर गोळा करून बडविली जात आहे. घरच्या घरी पीक काढले जात असल्याने मजुरांच्या खर्चातून मात्र सुटका होत आहे.