सतीश जोशी , परभणी लोकसभा निवडणुकीच्या निकालावर परभणी जिल्ह्यातील राजकारणाचे गणित मांडले जात आहे. या निकालाचे वारे कुठल्या पक्षाच्या बाजूने वाहते ते बघून जिल्ह्यातील काही मातब्बर नेतेमंडळी आपले विधानसभा निवडणुकीतील डावपेच आखत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नरेंद्र मोदी यांची हवा वाढत असल्याची चिन्हे दिसत होती तरी या बदलत्या हवेवरही परभणीतील मुत्सद्दी नेत्यांनी फारसा विश्वास न ठेवता लोकसभेचा निकाल काय लागतो, हे बघणे जास्त पसंद केले. नुकत्याच झालेल्या परभणी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचे उमेदवार जरी रिंगणात असले तरी जिल्ह्यातील या पक्षासह काँग्रेसमध्येही बरीच उलथापालथ पहावयास मिळाली. विधानसभेचे गणित समोर ठेवून जिंतूरमध्ये आ. रामप्रसाद बोर्डीकर यांनी आघाडीचा धर्म पायदळी तुडवीत शिवसेनेशी जवळीक साधत बाणाचा प्रचार केला. पक्षश्रेष्ठींनी वारंवार समजावूनही काँग्रेसचे बोर्डीकर यांनी कुणाचेही न ऐकता भांबळे यांच्या विरोधात प्रचार केला. या प्रकरणात काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी त्यांना आघाडीचा प्रचार करण्यांसदर्भात नोटीसही बजावली होती. या नोटीसला न जुमानता ज्या पद्धतीने त्यांनी शिवसेनेचे उमेदवार बंडू जाधव यांचा प्रचार केला, त्यावरुन ते मनाने युतीच्या जवळ गेल्याचे लोकांच्या लक्षात आले. लोकसभेचा निकाल काय लागतो, यावरही बोर्डीकर लक्ष ठेवून असले तरी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर या न त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजप-शिवसेनेच्या संपर्कात होते, हे जिल्ह्याने अनुभवले आहे. इकडे गंगाखेडमध्येही अपक्ष आ.सीताराम घनदाट यांनी बोर्डीकर आणि माजी राज्यमंत्री सुरेश वरपूडकर यांच्या हातात हात मिसळत बाणाचा प्रचार केला. आगामी विधानसभा निवडणुकीत ते स्वतंत्रपणे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरतात की पुरस्कृत होतात, हे ही या लोकसभेच्या निकालावर अवलंबून आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी राज्यमंत्री सुरेश वरपूडकर यांची भूमिकाही राष्ट्रवादीपासून दूर जाताना दिसत आहे. पक्षविरोधी काम केल्याबद्दल त्यांना पक्षाने नोटीस बजावली असली तरी त्यांनी हे नोटीस प्रकरण फारसे गांभीर्याने घेतले नाही. त्यांनी या नोटीसला उत्तरही दिले नाही. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत पाथरीमधून पक्षाने बाबाजानी दुर्राणी यांना उमेदवारी दिल्याने वरपूडकर यांना मतदारसंघ उरला नव्हता. इच्छा नसतानाही त्यांना गंगाखेडमध्ये निवडणूक लढवावी लागली. यावेळी आ. बाबाजानी दुर्राणी हे विधानपरिषदेवर निवडून गेल्याने पाथरीमधून विधानसभा लढविण्याची त्यांनी तयारी केली आहे. परंतु, लोकसभा निवडणुकीतील या नोटीस प्रकरणामुळे पक्षाची भूमिका काय असेल, हे ही महत्वाचे आहे. पाथरीमधून राजेश विटेकर, बाळासाहेब जामकर हे ही इच्छुक आहेत. याशिवाय सोनपेठचे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड, मोहन फड, हे ही रिंगणात उतरण्याची चिन्हे आहेत. परभणीतही लोकसभेवर गणित परभणीचे विद्यमान आ.बंूड जाधव यानी लोकसभा लढविली. लोकसभा निवडणुकीच्या निकालावर परभणी विधानसभेचे शिवसेनेचे गणित अवलंबून आहे. या निवडणुकीत बंडू जाधव विजयी झाले तर परभणीतील शिवसेनेचा उमेदवार कोण? हाही प्रश्न अनुत्तरीत आहे. परभणीप्रमाणेच जिंतूरचेही असेच आहे. राष्ट्रवादीचे विजय भांबळे हे लोकसभेवर निवडून गेल्यास तिथेही भांबळे यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. २००९ च्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे आ.रामप्रसाद बोर्डीकर यांच्या विरोधात आघाडीचा धर्म पायदळी तुडवीत बंडखोरी केली होती. या बंडखोरीचे पडसाद या लोकसभा निवडणुकीत उमटले होते.
लोकसभा निकालावर विधानसभेचे गणित
By admin | Updated: May 14, 2014 01:12 IST