मुंबई येथे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा करताना आमदार राहुल पाटील म्हणाले की, जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यावर परभणी जिल्ह्यातील ९७ हजार हेक्टर लाभ क्षेत्र आहे; परंतु हा कालवा नादुरुस्त असल्यामुळे पाण्याचे वहन पूर्ण क्षमतेने होत नाही. विशेषतः किलोमीटर १२२ येथे दाेन हजार १०० क्यूसेक वहनक्षमता असताना फक्त ९०० ते ११०० क्यूसेक क्षमतेने पाण्याचे वहन होते. यात परभणी विधानसभा मतदारसंघातील ५० टक्के गावे ही कालव्याच्या टेल भागात आहेत. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना आवश्यक ते पाणी मिळत नाही. त्यामुळे शेतकरी सिंचनापासून वंचित राहत आहेत. शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान होत असल्याने यासाठी निधीची तरतूद करावी तसेच पैठण किलोमीटर ०० हे २०८ मधील कालव्याची दुरुस्ती करण्यासाठी बैठक घेण्यात यावी, अशी मागणीही आ. पाटील यांनी यावेळी केली. यावेळी बोलताना जलसंपदामंत्री पाटील यांनी कालव्याच्या दुरुस्तीसाठी ६५० कोटी रुपयांचा आराखडा तयार करून त्यासाठी निधीची तरतूद केली जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी आमदार पाटील यांच्यासोबत दिनेश बोबडे, रवि पतंगे, प्रभाकर जैस्वाल आदी उपस्थित होते.
जायकवाडी डाव्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी निधीची तरतूद करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:13 IST