परभणी: मनपा आयुक्त म्हणून अभय महाजन हे रुजू झाल्यानंतर परभणी महानगरपालिकेचा कारभार सुधारेल, असे वाटले होते. परंतु, त्यांच्या दुर्लक्षामुळे अधिकारी- कर्मचाऱ्यांवर नियंत्रण राहिले नसून नागरिकांना मूलभूत सुविधाही मिळत नाहीत, असा आरोप काँग्रेसचे मनपा गटनेते भगवानराव वाघमारे यांनी केला.या संदर्भातील निवेदन त्यांनी आयुक्तांनाही दिले आहे. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, मनपा स्थापन होऊन अडीच वर्षाचा कालावधी संपला. परंतु, अद्यापही पाणीपुरवठा, विद्युत व्यवस्था व स्वच्छतेसारख्या मुलभूत सुविधाही देण्यास मनपा प्रशासन अपयशी ठरले आहे. या सुविधा देण्यासाठी आवश्यक तेवढा कर्मचारी वर्ग नसल्यामुळे त्याचा परिणाम अनेक विभागाच्या कामकाजावर होत आहे. जे कर्मचारी आहेत, त्यांच्यावरही अधिकाऱ्यांचे नियंत्रण नाही. महत्वाच्या खात्याचा कारभार हा रोजंदारीवरील कर्मचारी बघत असल्याने अनागोंदी आणि गैरव्यवहारही मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. विद्युत अभियंता नसल्यामुळे पाणीपुरवठा योजना ठप्प झाली असून १५-१५ दिवस नागरिकांना पाणी मिळेनासे झाले आहे. विद्युत खांबावर चढून काम करणारे तांत्रिक कर्मचारी नसल्यामुळे नागरिकांना अंधारात चाचपडावे लागत आहे. शहरातील अनेक भागातील गटार तुंबलेले आहेत. कचऱ्याचे ढीग जागोजागी साचले असून शहरातील घंटागाड्या व पाण्याचे टँकर दुरुस्ती व डिझेलच्या अभावामुळे बंद पडत आहेत. दोन वर्षापासून नागरिकांना या सारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मनपा आयुक्तांनी याकडे लक्ष देऊन प्रश्न सोडवावेत, अशी मागणीही त्यांनी केली.(जिल्हा प्रतिनिधी)
मनपा आयुक्तांचे दुर्लक्ष; मुलभूत सुविधाही नाहीत
By admin | Updated: June 17, 2014 00:38 IST