ग्रामीण भागात वाढल्या वीज समस्या
परभणी : ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात विजेच्या समस्या वाढल्या आहेत. वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, रोहित्र जळणे या समस्या नित्याच्याच झाल्या आहेत. याशिवाय वाकलेले विजेचे खांब, जीर्ण झालेल्या वीजतारा या समस्यांबाबत कुठलीही कार्यवाही केली जात नाही. त्यामुळे ग्रामस्थांना विजेच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.
शहरात वाढली अस्थायी अतिक्रमणे
परभणी : शहरातील बाजारपेठ भागात आणि मुख्य रस्त्यावर अस्थायी अतिक्रमणे वाढली आहेत. त्याचा त्रास वाहतुकीला होत आहे. स्टेशन रोड, निरज हॉटेल ते अण्णाभाऊ साठे चौक, नारायणचाळ परिसर, अष्टभुजा देवी मंदिर, गुजरी बाजार या भागात मोठ्या प्रमाणात किरकोळ अतिक्रमणे आहेत. रस्त्याच्या कडेला ही अतिक्रमणे थाटल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत.
पिकांवर किडीचा प्रादुर्भाव
परभणी : जिल्ह्यात रबी हंगामातील पिके सध्या वाढीच्या अवस्थेत आहेत. मुबलक प्रमाणात पाणी असल्याने पिकांची वाढही समाधानकारक आहे. मात्र, काही भागांत या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. वेगवेगळ्या प्रकारची कीटकनाशके फवारून कीड नियंत्रण करण्याचे काम शेतकऱ्यांकडून होत आहे.