खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात शेतकरी खरेदीसाठी बाहेर पडतात. पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतर कृषी केंद्र आणि प्रतिष्ठांनावर मोठी गर्दी होते. सध्या संचारबंदीमुळे सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे शेतातील पूर्व मशागतीची कामे आणि इतर कामांवर परिणाम होत आहे. बाजारपेठेतील दुकाने बंद असल्याने व्यापाऱ्यांनी भाववाढ केली आहे. या माध्यमातूनही शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत आहे.
खरीप हंगामात असा प्रकार होऊ नये, शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा मुबलक प्रमाणात व योग्य दरात मिळाव्यात यासाठी कृषीसंदर्भात असलेल्या सर्व सेवा आणि प्रतिष्ठाने दिवसभर सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे किशोर ढगे, भास्कर खटींग, उद्धव जवंजाळ, ॲड. आर. एस. शिंदे, मुंजाभाऊ लोंढे, गजानन तुरे, जाफरभाई तरोडेकर, केशव आरमळ आदींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.