उज्वल देशमुख, अकोला -
‘किस ऑफ लव्ह’ या आंदोलनाविषयी वाचलं. मान्य आहे, प्रेम करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. आणि ते प्रेम जगजाहीर करत जगासमोर आणावं की नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.
मात्र अशा प्रकारे रस्त्यात ‘काहीतरीच’ करून आंदोलन होत नसतात. ज्यांची पोटं भरलेली आहेत, दोन वेळचं कमावून खाण्याची तलवार ज्यांच्या डोक्यावर नाही त्यांनाच असली थेरं सुचतात. गरीब तरुणांना पोटापाण्याचे प्रश्नच जास्त महत्त्वाचे वाटतात. शारीरिक गरजांची एवढी वखवख नसते. जबाबदारीची जाणीव असते. या श्रीमंतांच्या पोरांना म्हणावं, जरा आलिशान गाड्यांतून उतरा. आपला समाज पाहा, इथले खरे प्रश्न पाहा. गरिबांच्या समस्या पाहा. जमल्यास तुमच्या पैशातून त्यांना मदत करा. समाजाला सुधारायला मदत करा, एकदम वरवर आधुनिक सुधारणा होत नसतात. त्यासाठी खर्या प्रश्नांसाठी, ते सोडवण्यासाठी आंदोलनं करावी लागतात. आधी ती कराच.
----------------------------
सोप्या उत्तरावर फुली
- आशुतोष दळवी, सोलापूर
‘किस ऑफ लव्ह’ या चळवळीविषयीचे ऑक्सिजनमधले लेख वाचले. खरं सांगतो, या असल्या फालतू गोष्टींना माझ्या लेखी काही किंमत नाही. सार्वजनिक ठिकाणी फालतू चाळे करणार्या जोडप्यांना चांगलं चोपलं पाहिजे असा माझा समज होता.
मात्र तुमचे लेख वाचले आणि वाटलं की, एका विषयाला किती बाजू असतात. आपल्याला तरी अनेक तरुण मुलांची कुचंबणा कुठं कळते. त्यांनी ‘तसलं’ काही जाहीरपणे करु नये, पण मग आपण समाज म्हणून त्यांना असं काही करायला भाग पाडतो का, हेसुद्धा तपासायला हवं. आपण अवघड प्रश्नांची सोपी उत्तरं शाोधायला जातो हाच एक प्रॉब्लेम आहे, हे मात्र मला नक्की समजलं. फक्त कट्टर विरोध आणि मूर्ख सर्मथन यानं हा प्रश्न सुटणार नाही. हे एवढं तरी मला नक्की समजलं आहे.