निसर्ग जेवढा सुंदर तितकाच तो निष्ठुर आहे याची जाणीवही पावसाळी ट्रेकला गेल्यावर येते. यंदा ट्रेकला जाणार असाल तर एन्जॉय करण्याचं प्लॅनिंग करण्यापूर्वी या १५ गोष्टी फक्त लक्षात ठेवा. त्यांचं पालन केलं तर दरवर्षीच पावसाळा आनंदाचं वरदान घेऊन येईल.
१ ट्रेक करताना खबरदारीच्या काही बेसिक गोष्टी तर आपल्याला तोंडपाठच हव्यात. निसर्गाचा मान राखून जर तुम्ही वावरलात तर ट्रेक करताना सहसा काही त्रास होणार नाही. आपल्याला दिलेले दोन हात व दोन पाय म्हणजे आपल्याकडे चार अँँकर पॉइंट्स असतात. जसं जहाज किनार्याला लावताना आपण लंगर टाकतो, अशाच लंगराची भूमिका आपल्या हात आणि पायांना निभवावी लागते, त्यासाठी डोंगरावरची नखभर खाचसुद्धा उपयोगाची ठरू शकते, हे कायम लक्षात ठेवायचं.
२ मुख्य म्हणजे पावसाळ्यात सगळ्या वाटा निसरड्या झालेल्या असतात. तेव्हा तीव्र स्वरूपाचा उतार असेल, उंच कडा असेल तर अशा ठिकाणी जास्त सावधगिरी बाळगावी. ओलेपणामुळे पाय पकड घेत नाही, असं वाटलं तर खुशाल फतक्ल मारून बसावं. मग हातानं एखादा कोपरा पकडायला मिळाला तरी तुमचा तो सुरक्षित अँँकर पॉइंट ठरतो.
३ तेच धबधब्यांकडे किंवा पाण्यांच्या वेगवान प्रवाहाजवळ जातानाही लक्षात ठेवायचं. अशाठिकाणी पाय घट्ट राहत नाही, तेव्हा चांगली जागा बघूनच, सावकाश जायचं, अती एक्साईटमेण्ट टाळायचीच. अशा ठिकाणी जाताना एखादी वाळलेली काठी किंवा हल्ली मिळणार्या ट्रेकर्स स्टिकचा वापर फायद्याचा ठरतो. डोंगरांवर जाताना नेहमी चांगले बूट असावे. जर बूट पकड घेणारे नसतील, तर दगडांमधल्या खाचांचा आधार पुढे जावं.
४ एखाद्या मार्गावरून अनेक जण गेले असतील तर ती वाट निसरडी बनते, अशा ठिकाणी शरीराचा तोल सांभाळत पुढे जावं. ट्रेकिंगमध्ये कुणाचीही कुणाशी स्पर्धा नसते. एखादा मागे राहिला तर त्याला हिणवू नये. वेगात पुढं जाण्याच्या स्पर्धेला अजिबात प्रोत्साहन देऊ नये.
५ जर एखाद्या ठिकाणी चालणं अवघड वाटत असेल, रस्ता धोकादायक वाटत असेल तर अशा ठिकाणाहून माघारी परत फिरणं हे शहाणपणाचं ठरतं. अपघात होऊन जखमी होण्यापेक्षा माघारी येऊन निसर्गाचा आनंद लुटता येतो. एक लक्षात ठेवावं की, डोंगरात अपघात झाला, तर त्याठिकाणी बचाव कार्य करणं खूप अवघड गोष्ट असते. वैद्यकीय सुविधा वेळेवर पोहचवणं शक्य होत नाही, तेव्हा आपणच काळजी घेतलेली बरी.
६ काही वेळेला, जोरदार वारे व पाऊस वाट अडवते, अशावेळी विचारपूर्वक निर्णय घ्यायला हवा. खूप विपरित हवामान होतंय का याचा अंदाज घेऊन सुरक्षित ठिकाणांचा शोध घ्यायला हवा. दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांचा अंदाज घ्यावा, काही वेळेला मोठे दगड घरंगळून येतात, त्याचाही अंदाज बांधता यायला हवा. यासाठी अनुभवी गटप्रमुख अत्यंत महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रात काही नावाजलेल्या गिर्यारोहण संस्था आहेत, अशा संस्थांच्या मदतीनं जर डोंगरयात्रांची आखणी केली, तर सोबत सुरक्षेची उपकरणं नेता येतात. मोहिमेच्या नेत्यांकडून सुरक्षेची योग्य काळजी घेतल्याची हमी बाळगता येते. विशेष म्हणजे त्यांना धोकादायक ठिकाणं समजतात. उत्तम खबरदारी घेता येते.
७ काही वेळेला तुम्ही एखादा ओढा किंवा नदी सहजपणे पार करून जाता पण परतताना पाऊस नसतानासुद्धा पाण्याचा प्रवाह वाढताना दिसतो. वरच्या भागात जोरदार पाऊस सुरू असेल तर असे प्रवाह ओलांडताना काळजी घ्यायला हवी. पाणी कमी आहे म्हणून अती धाडस करू नये. अचानक ओढय़ाचं किंवा नदीचं पाणी वाढण्याची शक्यता असते.
८ शक्यतो जेवणाचे डबे सोबतच न्यावेत. गडावर शिजवून खाण्याचं प्लॅन करूच नये आणि करायचाच असेल तर गुहा किंवा मंदिराची नीट माहिती घ्यावी, त्याठिकाणचा लाकुडफाटा ओला असण्याची शक्यता असल्यानं सोबत एखादा स्टोव्ह न्यावा व त्यातील रॉकेल हे स्वतंत्र बाटलीत काढून ठेवावं, म्हणजे प्रवासात रॉकेल सांडणार नाही.
९ सर्वात महत्त्वाचं म्हणजे डोंगर हे मद्यपानाचं ठिकाण अजिबात नाही, तेव्हा अशा उत्साही वीरांना सर्वांनी वेळीच आवर घालावा. ट्रेकला जातानाच काय पण पावसाळी पिकनिक करतानाही दारू अजिबात प्यायची नाही. साधा पाय घसरूनसुद्धा काही जण दगावलेत आहेत आजवर, तेव्हा पाऊस पिकनिक आणि दारू पिणं हे डोक्यातून काढून टाकलेलंच बरं.
१0 भर पावसात डोंगरांवर जाण्यात साहस अर्मयाद आहेच, ते आव्हान झेलण्यासारखा आनंद नाही, पण त्यासाठी आपली तयारी पूर्ण असावी. कारण छोटी चूकही परवडणारी नसते, जिवावर बेतू शकते.
११ प्रथमोपचाराची पेटी सोबत ठेवायला हवी. तसेच प्रथमोपचाराची माहिती असणाराही सोबत असायला हवा. बर्याचदा प्रशिक्षित मंडळी शोधताना अडचण येते. ही झंझट करत बसण्यापेक्षा काही होत नाही जाऊ असं म्हणत काही जण जातात, पण तसं करू नये. सह्याद्रीत, डोंगरांवर होणार्या पावसाळी अपघातातही वाढ झालेली आहे. विशेष करून पावसाळ्यात नवखी मंडळी उत्साहानं बाहेर पडतात, तेव्हा धोका वाढतो. काही दुर्घटना तर अगदी क्षुल्लक कारणांमुळे घडल्या आहेत. आपल्यातल्या क्षमता ओळखायला हव्या.
१२ तुम्ही स्वत:चं वाहन घेऊन साहस यात्रेला निघाले असाल तर गाडी चालवतानासुद्धा खबरदारी बाळगावी. घाटातले रस्ते निसरडे बनतात, तेव्हा त्यावरून सुरक्षिततेनं गाडी चालवावी. रस्त्याचे कडे तुटलेले असू शकतात, तेव्हा त्याचा अंदाज घेता यायला हवा. ज्या पुलावरून पाणी गेलंय त्या पुलावरून गाड्या घालू नका. टु व्हिलरवरचे स्टण्ट जिवावर बेतू शकतात.
१३ तुमचे परतीचे वेळापत्रकसुद्धा अगोदरच ठरवून घ्यावं. एकदा का अंधार दाटला की मग वाट मिळणं कठीण होऊन बसतं. त्यामुळे ये-जा ही उजेडातच करावी.
१४ पावसाळ्यात आणखी एक धोका असतो तो सापांचा. विशेषकरून पावसाच्या सुरुवातीला शेत, जंगलात किंवा पठारावर साप भक्ष्य शोधण्यासाठी येत असतात. तेव्हा सावध रहावं. काही औषधं सोबत न्यायला हरकत नाही; पण त्याची माहिती तज्ज्ञांकडून घेतलेली बरी.
१५ सर्वात महत्त्वाचं म्हणजे, आपला पावसाळी ट्रेक ही साहस यात्रा असली तरी पुढचं साहस करायला आपण जिवंत राहिलं पाहिजे. तेव्हा अतिधाडस, अतिएक्साईटमेण्ट,जिवावर बेतू शकते, हे लक्षात ठेवलेलं बरं.