समिंदरा सावंत -
नवीकोरी नोकरी असते; आपण कामही चोख करत असतो! सगळ्यांशी हसून खेळून बोलतो, गप्पा-चेष्टा सगळं सुरू होतं! कधीकधी कामावरून वादही व्हायला लागतात. आणि मग एक दिवस बॉस आपल्याला बोलावून सांगतो की, ‘तुमच्याविषयी बर्याच तक्रारी आहेत. तुम्ही जे मनात येईल ते बोलता, सिनियर-ज्युनिअर पाहत नाही, वाद घालता, उलट उत्तरं देता, तुमची बॉडीलॅँग्वेज अशी की तुम्ही स्वत:ला कोण समजता?
हे असंच चालत राहिलं तर कसं काम करणार तुम्ही टीममध्ये? तुमचं वागणं सुधारा !’
अशावेळी अनेकांना हे कळत नाही की, मी तर ऑफिसात सगळ्यांशी चांगलाच वागतो. कुणी टोमणे मारले, वाद घातला तर का सहन करायचं? आणि भांडण झालंच तरी ते कामासाठीच ना, मग तरी लोक म्हणजे सहकारी स्वत: चुकीचं वागून माझ्याचविषयी तक्रारी करतात, याला काय अर्थ आहे?
पण असं संतापून प्रश्न सुटणार नाही. तो सोडवायचा असेल तर ‘कम्युनिकेशन’ नावाचं जे सॉफ्ट स्किल आहे, जी संवाद कला आहे, ती आपल्याला अत्यंत विचारपूर्वक स्वत:त भिनवावी लागेल.
त्यासाठी नव्या नोकरीत पाऊल ठेवल्यावर नेमकं काय काय घडू शकतं, हे लक्षात ठेवा!
नव्या नोकरीतले कोरे प्रश्न
* आपल्या सहकार्यांशी कामावरून मतभेद होऊच शकतात. काम कशा प्रकारे करावं, कशा सिक्वेन्सनं करावं, आधी कशाला प्रायॉरिटी द्यायची, याबाबतीत मतभेद असू शकतात.
* त्यात दोन सहकार्यांच्या व्यक्तिमत्त्वातला फरक अनेकदा वादास कारणीभूत ठरतो. एक खूप बोलका, उत्साही, अँग्रेसिव्ह, दुसरा ढिम्म, चेहर्यावरची माशी न हलणारा, कामात स्लो, एकलकोंडा. अशावेळी जे बोलणं होतं, त्यातून आणि जे होत नाही त्यातूनही गैरसमज, वाद होऊच शकतात.
* त्यात काही तात्त्विक मतभेदही होतातच. विचारसरणी, काम आणि जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, मतं यावरून परस्परांविषयी चीड वाटून कामात संघर्ष उद्भवतातच.
* काही वेळा वैयक्तिक संघर्ष नसला तरी ऑफिस पॉलिटिक्सचा त्रास होतो. ऑफिसात कधी कधी गटतटं असतात, आपण कुठल्या गटात आहोत, नाही आहोत यावरून संघर्ष निर्माण होतात.
कम्युनिकेशन स्किल
काय जादू करेल?
* बी प्रॅक्टिकल. आपण वेगवेगळ्या स्वभावाच्या, वृत्तीच्या माणसांसोबत एका छताखाली काम करतो, काम करताना मतभेद व्हायचेच, हे मान्य करू टाका. प्रत्येक वेळेस इमोशनल होऊन सगळं पर्सनली घ्यायचं काहीच कारण नाही. जो प्रश्न आहे, तो प्रॅक्टिकली सोडवण्याचा, इमोशनल न होता, ऑबजेक्टव्हिली गोष्टी पहा.
* ज्याच्याशी आपलं पटत नाही. त्याच्याशी बोलणं, जमवून घेणं हीच तर संवाद कलेची पहिली पायरी. बोलून सुटत नाहीत, असे जगात कुठलेच प्रश्न नाहीत, यावर विश्वास ठेवून, शांतपणे आदरपूर्वक बोलण्याचा प्रयत्न करा.
* डिस्टर्ब होऊ नका. शांत राहा. शांतपणे विचार केला तर प्रश्न सोडवण्याचा काहीतरी मार्ग दिसेल. आपलं मन विचलित झालं की आपल्या भावना त्यामध्ये गुंतल्या जातात, आपल्या नकळत आपला आवाज चढतो, आणि मग मतभेदाचे रूपांतर भांडणात होतं. ते टाळा.
* काम आणि व्यक्ती यातले अंतर लक्षात घ्या. अर्थात, हे करणं तसं कठीणच. आपण जसं काम चांगलं व्हावं म्हणून प्रयत्न करतो, तसंच काम ती व्यक्तीही करत असेल. त्यामुळे कामातून होणारे वाद तिथंच सोडा, पर्सनली घेऊ नका. असा विचार केला तर त्या व्यक्तीचं वागणंही चुकीचं वाटणार नाही.
* जरा दुसर्याचंही ऐकायला शिका. एखाद्याचं मत आपल्यापेक्षा वेगळं आहे, म्हणजे ते चुकीचंच असेल, असं काही नाही. आपल्यापेक्षा वेगळी मतं स्वीकारली, निदान ऐकली तरी गोष्टी सोप्या होतील. त्यामुळे आधी ऐकायला शिका. शांतपणे ऐका, विचार करा, कदाचित आपलंही चुकत असेलच!
* वाद झाले म्हणजे प्रत्येकवेळेस आपला विजय आणि दुसर्याचा पराजय झालाच पाहिजे हा हट्ट सोडा. परिस्थिती निभावून नेण्यासाठी काही सुवर्णमध्य काढा. तडजोड म्हणजे माघार नव्हे, आपल्या सहकार्यांशी जुळवून घेणं, कामापुरता तरी उत्तम संवाद साधणं, हे उत्तम करिअरसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. ते जमलं तरच तुम्ही चांगली टीम बनवू शकता, आणि चांगले रिझल्ट्सही देऊ शकता. हे केलं तर, इतरांनी तुमच्याविषयी केलेल्या तक्रारी विफल ठरू शकतील!