- अमोल पाटील
शाळा सुटल्याची घंटा वाजली तशी आम्ही सारी मुलं घरी जाण्यासाठी वर्गाबाहेर पडलो. घर जसजसं जवळ येत होतं तसतशी मनात धडधड होती. कारण त्या दिवशी शाळेत दुपारच्या सत्रात वक्तृत्व स्पर्धा पार पडल्या होत्या. त्या स्पर्धेत मीही सहभाग घेतला होता. इयत्ता पाचवीच्या वर्गात असताना मी पहिल्यांदा असं स्पर्धेत भाग घेऊन भाषण केलं. भाषण ऐन भरात असतानाच पाठ केलेली वाक्यं नीटशी आठवली नाहीत आणि मी अडखळलो. नंबर आला नाही. स्पर्धेत भाग घेतला हे वडिलांना माहिती होते. घरी येताच त्यांनी विचारलंच, काय झालं. मी घाबरलो होतो. गप्प होतो. ते म्हणाले, ‘स्पर्धेत सहभाग घेत राहा!’ त्यानंतर गावच्या शाळेत दहावीर्पयत मी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेत राहिलो. आणि मला बक्षीस मिळालं नाही असं कधी झालं नाही. एकदा तर माझं भाषण आवडल्यामुळे भाषण संपताच शाळेच्या संस्थाचालकांनी माझा पुष्पहार घालून सत्कार केला. वक्तृत्वावरील माझ्या प्रभुत्वामुळे मी शाळेतील सर्व शिक्षकांचा लाडका झालो. लातूर जिल्ह्यातील जनापूर या माझ्या छोटय़ाशा गावातील निसर्गरम्य वातावरणातली चंगळामाता आश्रमशाळा. दहावीला 78 टक्के गुण मिळवून मी केंद्रातून पहिला आलो.पण मी नववीत असतानाच वडिलांचं निधन झालं. आमच्यावर खूप मोठं संकट कोसळले. घर आर्थिक संकटात होतंच पण वडिलांच्या निधनानंतर घराची जबाबदारी आईवर येऊन पडली. माझी आई म्हणजे सकारात्मकतेचा अखंड झरा. अगदी शेवटच्या क्षणार्पयत लढत राहणं हे मी तिच्यापासूनच शिकलो. दहावीनंतर मी उदगीरच्या आयटीआयला प्रवेश घेतला. तिथं माझं मन रमलं नाही. सहा महिन्यातच मी आयटीआय सोडलं. नंतरचे सहा महिने गावात नुसता फिरत राहिलो. केंद्रात पहिला आलेला मुलगा म्हणून नुकतंच तोंडभरून कौतुक केलेल्या गावकर्यांना माझ्या या रिकामं फिरण्याचं मोठं कोडं पडलं.अखेर लातूरच्या महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात माझ्या मावसभावानं कला शाखेत माझा प्रवेश निश्चित केला. भावजींच्या मार्गदर्शनाने शेतकर्यांच्या मुलांसाठी असलेल्या वसतिगृहात प्रवेश मिळाला. मी बारावीमध्ये 89 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झालो. उदगीरच्या शासकीय आध्यापक विद्यालयात मला प्रवेश मिळाला. तिथं माझ्या वक्तृत्व कलेला वाव मिळत गेला. दिवस दर दिवस मी नव्या गोष्टी शिकत गेलो. डी.एड. पूर्ण झाल्यानंतर मी लातूरच्या एका खासगी वसतिगृहात निवासी शिक्षक म्हणून काम करू लागलो. तिथं माझ्या राहण्याची आणि निवासाची सोय झाली. पुस्तके घेणं आणि कुठं जागा निघाल्या की फॉर्म भरण्यास लागणार्या खर्चासाठी त्यांच्याकडून मिळणार्या दरमहा दीड हजार रु पयाची खूप मदत व्हायला लागली. डी.एड. होईर्पयत अतिशय कष्ट करून माझ्यासाठी आई पैसे पाठवत होती. दरम्यान, मुंबई महापालिकेत शिक्षकभरतीची जाहिरात पेपरमध्ये वाचली. फॉर्म भरण्यासाठी थेट मुंबई गाठली. तिथं महापालिकेच्या शाळेत मी 2011 मध्ये शिक्षक म्हणून रु जू झालो. दरम्यान मुक्तविद्यापीठातून मी एम.ए मराठीचं शिक्षण पूर्ण केलं. लहानपणी गावच्या शाळेतील लहान मुलांमुलींना भाषणं लिहून देणारा मी आता लेख, कविता लिहू लागलो, साहित्य संमेलनामध्ये सहभागी होऊ लागलो. आता मी मालाडवरून विरारला राहायला आलो. दरम्यान पेपरमधील जाहिरात वाचून माझ्या मित्रांनी माझे साहित्य महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेसाठी पाठविण्याचं सुचवलं. त्यामुळे माझ्या ‘इंद्रधनुष्य’ या पहिला कवितासंग्रह अनुदानप्राप्त ठरला. 2014 साली तो प्रकाशित झाला. आता मी लिहितो, ब्लॉगही लिहितो. गावाकडचं मातीतल जगणं, शेतकर्यांच्या पीडा मांडतो. वेळोवेळी स्थलांतर झालं त्यानं माझ्या अनुभव कक्षा विस्तारत गेल्या, जगण्याला बळ मिळत गेलं हे नक्की!