जलीकट्टू. हा शब्द गेला आठवडाभर सतत आपल्या कानावरून गेला. त्याच्या उलटसुलट बाजू. वाद-प्रतिवाद, अस्मितांचं राजकारण असं बरंच काही.. या साऱ्यात तमिळ तरुण मोठ्या संख्येनं सहभागी झाले. आपापल्या आयटीवाल्या एसी क्युबिकल्समधून अनेकजण पहिल्यांदाच रस्त्यावर उतरले.आयटीमध्ये काम करणाऱ्यांसह उच्चशिक्षित तरुणांचा सहभाग यात लक्षणीय होता. चेन्नईतच नाही तर अमेरिकेतही अनेक उच्चशिक्षित तमिळ तरुणांनी मोर्चे काढून जलीकट्टूला पाठिंंबा दिला. सामान्य तमिळी तरुण ते ए. आर. रहमानसारखे असामान्य हे सारे या लढ्यात प्रत्यक्ष उतरले. न्यायालयाचा यासंदर्भातला निकाल अपेक्षित असला आणि राज्य सरकारने अध्यादेश काढून या खेळाला परवानगी दिलेली असली तरीही यापलीकडे ही चर्चा सुरूच राहील अशी चिन्हं आहेत.
एकीकडे सर्वत: आधुनिक जीवनशैली स्वीकारलेली ही तरुण मुलं जलीकट्टूसारख्या पारंपरिक खेळाला का पाठिंबा देतात? प्राण्यांना अत्यंत क्रौर्यानं वागवलं जातं, त्यांच्या जिवाशी खेळ केला जातो असा ज्यावर मोठा आक्षेप आहे, तो खेळ, ती प्रथा चालू राहावी असं या आधुनिक मुलांनाही का वाटतं?हे समजून घ्यायचं म्हणून तमिळ मुलांचा प्रतिनिधी असलेल्या आणि आयटीत काम करणाऱ्या भारथीराज याचं हे मनोगत. त्यानं मांडलेल्या मुद्द्यांविषयी आक्षेप असू शकतो, मतभेद होऊ शकतात; मात्र तरीही आॅक्सिजनचा हा एक प्रयत्न तमिळ तरुण मुलांच्या मनात डोकावण्याचा..- आॅक्सिजन