- मेघना ढोके
कुछ ना कुछ तो करना ही था, तो बगावत कर दी.- तो दिलखुलास हसून म्हणाला; पण त्या म्हणण्यात एक असहाय हतबलता जाणवते. विषण्ण. उदास स्वर.विचारलंच त्याला, ‘फिर क्यूं किया यह मॅडनेस? आया कहॉँसे ये पागलपन?’तसा तो पटकन म्हणाला, ‘कोई कुछ भी कहें, गाली दे, इसका मतलब यें नहीं की हम रुक जाए.’थांबलं - नाकारलं आणि झापडं बांधून बसलं की काय होतं समाजाचं, माणसांचं आणि कलेचंही त्याचीच तर गोष्ट तो सांगतोय. आजच्या घडीला त्याची ही गोष्ट दुनियेनं डोक्यावर घेतली आहे; पण त्याच्या देशात मात्र त्याच्या त्या गोष्टीवरही ‘हराम’ लेबल चिकटलं आहे.जवाद शरीफ त्याच नावं. एक तरुण पाकिस्तानी फिल्ममेकर. त्याची ‘इंडस ब्ल्यूज’ ही शॉर्टफिल्म सध्या जगातल्या अनेक फिल्म फेस्टिव्हलमध्ये नावाजली जातेय. पाकिस्तानातही काही ‘सुलझे हुए’ लोक त्याच्या धाडसाचं कौतुक करताहेत; पण बाकी मात्र त्याच्या वाटय़ालाही भरपूर टीका, नालस्ती आली. असं काय आहे त्याच्या फिल्ममध्ये?खरं तर काहीही ‘स्फोटक’ किंवा विशेष खास नाही.एक दिवस हा तरुण मुलगा उठला, त्यानं काही आपल्यासारखेच पागल जमवले आणि कॅमेरा घेऊन सिंधू नदीच्या खोर्यात फिरला. उभाआडवा फिरला. त्या एकेकाळच्या समृद्ध खोर्यात कोणे एकेकाळी सूरसाज झंकारले. लोकगीतांपासून ते गीत-संगीत ते थेट वाद्यवादनार्पयत माणसं तालात जगली. आज ते ताल-सूर हरवलेत, नुस्ते हरवलेच नाहीत तर संपण्याच्या वाटेवर आहेत, आणि जे उरलेत ते धर्मानुसार निषिद्ध आहे असं ठरवून ते वाजवणार्या साजिंद्याना भ्रष्ट ठरवणं सुरू झालं आहे. मात्र तरीही या मुलानं ठरवलं की, जे फनकार उरलेत त्यांना तर भेटू.कॅमेर्यासह त्यानं सिंधू नदीचं खोरं, ते अरबी समुद्राचा किनारा ते कराकोरम पर्वत रांगा पिंजून काढल्या आणि पाकिस्तानातल्या काही अनवट सुरील्या हरवल्या जागाही शोधल्या. तिथं भेटलेली मौसिकी, फनकार आणि त्यांचं आजचं जगणं, धर्माध माणसांनी जगण्यातून पुसून टाकलेले सूर हे सारं तो या आपल्या फिल्ममधून मांडत राहतो. त्या फिल्मचा यू टय़ूबवर उपलब्ध ट्रेलर पाहिला तरी कळतं की, हजारो वर्षाची संस्कृती, सांझी लोकसंस्कृती आणि लोकजीवन नाकारलं की माणसांचं काय होतं, जे कधीकाळी समृद्ध होतं त्याला कसा चूड लागतो.
आणि हे सारं जवाद फक्त सांगत नाही, तर त्यानंही स्वत: वाढताना, हे सारं अनुभवलेलं आहे. कनिष्ठ मध्यमवर्गीय घरातला हा मुलगा. ही फिल्म बनवण्याचा त्याचा ट्रिगरही त्याच्या वाढीच्या दिवसांत त्याला आलेल्या अनुभवातला असावा. त्याच्या घरच्यांना वाटायचं मुलानं चारचौघांसारखं काम करावं. जवाद सांगतो , ‘घरवाले कहते थे बेटा कुछ अच्छा काम कर, कुछ और कर, कुछ ऐसा कर जिससे इज्जत मिले.’ आपला मुलगा कलेशी संबंधित काही करणार आहे हे घरच्यांनाच मान्य नव्हतं, तिथं समाजात विरोध झाला याचं जवादला काहीही वाटलं नाही. तो सांगतोच, ‘हमारे दिमाग में ही ये पुश कर देते है, की मौसिकी इज्जतवाला काम नहीं है! मैने सोचा चलो, ना सहीं कर लेते है!’सिंधू नदीच्या खोर्यात मग तो फिरला. हरवलेली मरणपंथाला लागलेली वाद्यं त्यानं शोधली. असे लोक भेटले की, ते वाद्यं वाजवणारी तर आता शेवटची एकेक माणसं उरली आहेत. (पिढी नव्हे !) त्यातलंच एक उदाहरण सारंगीचं. संपूर्ण पाकिस्तानात आता सारंगी वाजवणारे दोन-तीनच कलाकार उरलेत. एकेक लोकवाद्यं तर अशी की, ती बनवणारी माणसंच नाहीत, वाजवणारा कुणी एकेकटा, एकांडा फनकार भेटतो. तोही गुपचूप वाजवतो. कुणाला कळलं तर काय ही भीती असतेच.ही माणसं एकेक करून संपली की, संपलं सगळं असं जवाद म्हणतो. सिंधू नदीच्या काठांवरून ते संपू नये अशी त्याची कळकळ आहे. त्या कळकळीपोटीच त्यानं ही फिल्म केली आणि आता तो जगभर आणि पाकिस्तानातही आपली फिल्म दाखवत फिरतो आहे..
(लेखिका लोकमत वृत्तपत्रसमूहात मुख्य उपसंपादक आहेत.)meghana.dhoke@lokmat.com