- पवित्रा कस्तुरे
पावसाळा रोमॅण्टिक वाटतो, तुझ्या डोळ्यात पाऊस दिसतो वगैरे म्हणतात काहीजण. ते खरंखोटं त्यांचं त्यांच्याकडे. पण, ‘जीवन से भरी तेरी आंखे, मजबूर करे जीने के लिए’ असं आपल्याला कुणी म्हणो ना म्हणो, आपल्या जीवनात तरी आपले डोळे फार महत्त्वाचे आहेत. इतरांना ते काही सांगो ना सांगो, इतरांना आपल्या नजरेची भाषा कळो ना कळो, आपल्याला मात्र ती भाषा कळली पाहिजे. आपले डोळेही आपल्याशी बोलत असतात. पावसाळ्यात तर जरा जास्तच बोलतात. त्यासाठी त्यांची भाषा कळली पाहिजे. ती कळण्यासाठी अर्थात स्वतर्कडे लक्ष द्यायला पाहिजे. पण तेवढाही वेळ नसेल तर किमान डोळे दाखवत असलेली काही लक्षणं तरी पाहा. तुम्हाला काही तक्रारी वारंवार होत असतील तर डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जा.पावसात भिजलं की हमखास अनेकांचे डोळे लाल होतात, चुरचुरतात. डोळे येतात. त्यातून पाणी वाहतं आणि डोळ्यांची आग काही उमजू देत नाही. त्यामुळे पावसाचा रोमान्स राहतो बाजूलाच आणि डोळे वाचवा मोहीम सुरू होते. त्यात हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे आपल्यामुळे इतरांना प्रसाद मिळणार नाही, याचीही काळजी घ्यावी लागते. खरंतर दरवर्षी पावसाळ्यात आपल्याकडे डोळे येण्याची साथ येते. स्वच्छतेची माहिती देत जनजागृतीही होते पण तरीही हा आजार वाढतोच. पाऊस आत्ताच कुठं सुरू झालाय. त्यामुळे यंदा तरी आपले डोळे येऊ नयेत म्हणून काही गोष्टी रोज ठरवून करायला हव्यात. डोळे येणं हा आजार एक प्रकारचं बॅक्टेरिअल इन्फेक्शन असतं. फंगल, केमिकल इन्फेक्शनमुळेही डोळे येतात. त्यामुळे काही गोष्टी टाळल्या तर आपण आपले डोळे येणार नाहीत इतपत खबरदारी घेऊ शकतो.