शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

‘गन’ नहीं ‘अमन’!

By admin | Updated: February 19, 2015 20:23 IST

हुंदक्यांचे गुंज सगळीकडूनच ऐकायला येताहेत.. एक अस्वस्थ वेदना, असाहायता, अविश्‍वास आणि संशयाचे भोवरे गडद होतातहेत.

 
समीर मराठे -
हुंदक्यांचे गुंज सगळीकडूनच ऐकायला येताहेत.. एक अस्वस्थ वेदना, असाहायता, अविश्‍वास आणि संशयाचे भोवरे गडद होतातहेत.
कधी धर्माच्या नावावरून, कधी जातीच्या नावावरून तर कधी प्रांतीय अस्मितेवरून.
कधी वर्चस्वववादावरून, कधी वर्णावरून, कधी अभिव्यक्तीवरून तर कधी भाषेवरून.
प्रत्येक जण हिंसेची पलितं घेऊन आणि जागोजागी ठिणग्या टाकत पुढे पुढे चालताना दिसतोय. 
विद्वेषाचा वणवा पेटवण्याचं काम अव्याहत सुरूच आहे. बर्‍याचदा मुद्दाम. जाणूनबुजून.
एकमेकांविषयीचा असंतोष आणखी गडद कसा होईल, टोकाची अस्मिता आणखी काय काय घडवेल आणि कुठे घेऊन जाईल याविषयी काहीच सांगता येत नाही.
.अशावेळी काही तरुण पुढे येऊन विसंवादाची ही दरी कमी करू पाहताहेत. आपसातला भाईचारा वाढावा म्हणून मनापासून प्रयत्न करताहेत. दोस्तीचा हात पुढे करत, फसव्या भूलथापांच्या जाळ्यात अडकू नका म्हणत राज्याराज्यांत, गावागावात जाऊन तरुणांना आवाहन करताहेत..
कोण आहेत हे तरुण?
त्यांचं एकमेकांशी रक्ताचं नातं नाही, धर्माचं नातं नाही, प्रांताचं नाही, अस्मितेचं तर नाहीच नाही.
अगदी त्यांची जात आणि धर्मच सांगायचा झाला, तर यातलं कोणी हिंदू आहे, कोणी मुस्लीम तर कोणी बौद्ध.
एकमेकांशी आणि देशातील सार्‍याच युवकांशी ते नातं जोडताहेत ते सौहार्दाचं, शांतीचं, एकोप्याचं, संयमाचं आणि सहिष्णुतेचं.
आणि अर्थातच वेदनेचंही.
ही ठसठसती वेदना त्यांनी स्वत: पाहिली आहे, अनुभवली आहे, कधीही पुसले न जाणारे भळभळते व्रण आजही त्यांच्या तनमनावर ताजे आहेत. 
हे तरुण आहेत जम्मू, काश्मीर आणि लेह-लडाखमधले.
सारे कोवळे तरुण. १५ ते २५ या वयोगटातले.
जाहीद भट, जोगिंदर सिंग, आशिक खान, स्टॅनझिन दोरजे, रुबीना मीर.
म्हटलं तर ही सारी प्रातिनिधिक नावं. 
भारतातल्या तरुणाईचं प्रतिनिधित्व करणारी.
जन्माला आल्यापासून त्यांनी पाहिला फक्त हिंसाचार, दहशतवाद आणि वाहिली अविश्‍वासाची रक्तरंजीत पालखी.
स्वत:चं घरदार, गाव, जवळची माणसं उद्ध्वस्त होताना त्यांनी डोळ्यांनी पाहिलं, टोकाचा अत्याचार सोसला, सहन केला, रक्ताची माणसं, घरच्यांचे मृत्यू, अतिरेकी आणि आर्मी. या दोहोंच्या बंदुकीच्या भयापासून स्वत:ला वाचवण्याचा आणि त्यांच्यापासून दूर पळण्याचा प्रयत्न.
आजही त्यांच्या परिसरात हे असंच सुरू आहे. सारीकडून कोंडमारा आणि तोंडातून ब्रसुद्धा काढायला नकार.
त्यातून मनात क्रोधाचा अंगार पेटला नाही असं नाही, सार्‍या जगावर सूड उगवावासा वाटला नाही असं नाही. अत्याचार आणि अन्याय नाहक सोसल्याची बोच आणि दाहकतेनं त्यांना आतून कुरतुडलं नाही असं नाही. त्यातून आपणही बंदूक उचलण्याची इच्छा त्यांना झाली नाही असं नाही, किंबहुना त्यांनीही जवळजवळ उचललीच होती बंदूक हातात. पण ऐनवेळी त्यांना त्यातली वैयर्थ्यता लक्षात आली, बंदुकीनं नाही तर भाईचार्‍यानंच सार्‍या गोष्टी सुटतील, दुष्मनीनं, बदल्याच्या भावनेनं नाही, तर दोस्तीच्या पुढे केलेल्या हातानंच हा अंगार शांत होईल. हे त्यांना कळलं आणि तोच संदेश घेऊन ते आता भारतभर फिरताहेत.
नुकतीच त्याची सुरुवात झाली. 
याच दौर्‍यात या सार्‍याच तरुणांची भेट घेतली आणि जाणून घेतली त्यांची दास्तॉँ.
गेली कित्येक वर्षे या मुलांनी खूप सारं सोसलं, नुसतं सोसलंच नाही, तर कधीही भरून येऊ न शकणार्‍या या जखमांचे भळभळते व्रण आजही त्यांच्या तना-मनावर ताजे आहेत, पण या सार्‍याच मुलांचं वैशिष्ट्य म्हणजे इतकं सारं घडूनही त्याविषयी आज त्यांच्या मनात यत्किंचितही कडवटता नाही.
एकता, बंधुत्वाचा धडा त्यांच्याशिवाय अधिक चांगल्या पद्धतीनं आणखी कोण देऊ शकणार?.
ठिकठिकाणी जाऊन हे तरुण आपल्या समवयस्क तरुणाईला आवाहन करताहेत. 
एकतेचा संदेश देताहेत. हिंसाचाराचं उत्तर हिंसाचार नाही, विद्वेषाचं उत्तर विद्वेष नाही, एकमेकांचा हात हातात घेऊन सोबतीनं पुढे गेलं तर सार्‍या जगाला ऐक्याचा आणि विविधतेतून एकतेचा संदेश देणारा भारत परत एकदा आपल्याला दिसेल. असा आशावाद जागवण्याचा प्रयत्न ते करताहेत.
विविध धर्माची, जातीची ही सारीच तरुण मुलं पुण्यात ‘सरहद’ या संस्थेत राहतात, तिथेच शिकतात. काश्मिरातल्या दहशतवादाच्या छायेतून या संस्थेनं त्यांना पुण्यात आणलं. त्यांच्या शिक्षणापासून तर पालनपोषणापर्यंतची सारीच जबाबदारी उचलताना त्यांचं पालकत्व स्वीकारलं. भेदाभेदाची दरी कमी व्हावी, वास्तवाच्या चटक्यांनी पोळलेली ही मुलं मुख्य प्रवाहात यावीत, कुठल्याही सक्तीपेक्षा स्वानुभवातून त्यांना वास्तवाचं भान यावं आणि नंतर त्यांनी स्वत:च ठरवावं नेमकं कुठे चुकतंय आणि काय करायला हवं. हा ‘सरहद’चा हेतू.
या सार्‍याच तरुणांचं आयुष्य खडतर होतं, आजही आहे, वतन की याद. त्यांनाही साद घालतेच, पण या सार्‍याच तरुण मुलांचं म्हणणं. योग्य वेळी योग्य मार्ग आम्हाला दिसला म्हणून आम्ही पुन्हा ‘माणसांत’ आलो.
त्यांचं म्हणणं आहे, झालं गेलं मागे ठेवून आपण सारे मिळून भविष्याचा विचार करू या. मानवतेचा संदेश सगळीकडे पसरवू या.
धार्मिक, प्रांतिक, भाषिक विखार पसरवणार्‍यांपासून आपण जाणीवपूर्वक दूर राहू या आणि त्यांचे हे डावपेच उधळून लावू या.
१८ महिन्यांत देशातल्या तब्बल एक कोटी युवकांपर्यंत पोहोचण्याचं या तरुणांचं ध्येय आहे. 
या तरुणांचं आणखी एक वैशिष्ट्य. या सार्‍या प्रवासात ते राजकारणावर भाष्य करणार नाहीत, सरकारी धारणांवर टीकाटिप्पणी करणार नाहीत, अमुक गोष्टी करू नका म्हणून सांगणार नाहीत. त्यांचं म्हणणं फक्त एकच. आपला धर्म कोणताही असू द्या, प्रांत कोणताही असू द्या, भाषा भिन्न असू द्या, पण तरीही आपल्यातलं माणुसकीचं नातं एकच आहे, प्रेमाचं नातं एकच आहे, वेदना आणि अनुकंपेचं नातं एकच आहे, ज्या नैतिक, वैचारिक आणि पारंपरिक मूल्यांच्या आधारे हजारो वर्षांपासून आपल्या देशाला बांधून ठेवलेलं आहे ती आपली मूल्यंही समान आहेत. त्याचाच आपण जागर करू या.
ना आपस में लकिरे खिंचो, ना सरहद पार करो.
किसी भी मसले का हल ‘गन’ नहीं ‘अमन’ है.
.असं म्हणणारे हे तरुण नेमके आहेत तरी कोण?.
 
 
> जाहीद भट
काश्मीर खोर्‍यातल्या बडगाम जिल्ह्याचा जाहीद पुण्यात एलएल.बी. करतोय. वय २२ वर्षं. साधारण दहा वर्षांपूर्वी तो पुण्यात आला. तो उत्तम वक्ता आहे. मराठीही छान बोलतो. एक दिवस जम्मू-काश्मीरचा मुख्यमंत्री व्हायचं त्याच स्वप्न आहे.
जाहीद सांगतो, लहानपणापासून आमच्या गावात, परिसरात, खोर्‍यात मी पाहिली ती फक्त अशांतता आणि हिंसाचार. मौत इधर भी थी, उधर भी ! गॉँव में टेररिस्ट का आना-जाना भी हमेशा का था. किसी भी घर में, मोहल्ले में घुसते थे, बंदुक सिनेपर तानकर कहते थे- ‘खाना पकाव, जल्दी खाना दो.’ - उनको कौन इन्कार कर सकता था !
हथियार लेकर दुसरे दिन आर्मी आती थी. पुछते थे, ‘बोलो, आतंकवादीयोंसे साथ तुम्हारा क्या रिश्ता है? उन लोगे से तुम मिले हो. तुम्हारेही घर वो कैसे आए और आप ने उन्हें खान क्यों दिया?
‘क्रॅकडाऊन’ भी हमेशा.
(‘क्रॅकडाऊन’ म्हणजे आर्मीला काही शंका आली, गावात कोणी अतिरेकी लपला आहे, तिथे त्यानं सहारा घेतला आहे असा नुसता संशय जरी आला तरीही खबरदारी म्हणून गावातल्या प्रत्येक माणसाला आपापल्या घरातून बाहेर काढून मोकळ्या मैदानात नेलं जातं आणि त्यांच्या घराची ‘तलाशी’ घेतली जाते. वैयक्तिक चौकशी?- तीही आहेच सोबतीला !)
जाहीद सांगतो, ‘लहानपणापासून मी पाहात आलो ते हेच, इधर भी बंदूक, उधर भी बंदूक ! और बीच में हम. आह भी नहीं कर सकते थे !’
एकेदिवशी कोणीतरी गलत खबर दिली, ‘आतंकवादीयों से ये मिले हुए है !’ झालं, आर्मीनं लगेच माझ्या दोन्ही मामांना उचलून नेलं. ‘थर्ड डिग्री’ चौकशी झाली. आर्मीला काहीच, कुठलाच दुवा सापडला नाही. त्यांनी दोन्ही मामांना पुन्हा सोडून दिलं शिवाय त्यांना संरक्षणही दिलं.
पण त्यांच्या थर्ड डिग्री चौकशीमुळे माझे दोन्ही मामा किमान दोन महिने साधं चालूही शकले नाहीत.
हे सारं मी पाहात होतो, सोसत होतो. दिल में खून का अंगार था. वाटायचं, यात आपली काय चूक? कशासाठी आपण सोसायचं? अन्याय, अत्याचार, अपमान.
मी ठरवून टाकलं, ‘बंदूक की नोकपर अगर जिना है, तो निहत्थे क्यों? हम भी हात में बंदूक उठाएंगे. खून का जवाब खून से, बंदूक का बंदूक से और गोली का गोली से देंगे. आतंकवादी बनना चाहता था मैं.
.पण पुण्यात आल्यानंतर, परिस्थितीचा शांतपणे विचार केल्यानंतर कळलं, यात आर्मीचीही काही चूक नव्हती. आमच्याचसाठी तर हे सारं ते करत होते. बंदूक किसी मसले का हल नहीं हो सकता. प्यार-मोहब्बत सेही दिल जिते जा सकते है. मैं अब वही करना चाहता हॅँू.
 
> जोगिंदर सिंग
ठेंगणानुसका, हसर्‍या चेहर्‍याचा जोगिंदर डोडा जिल्ह्याचा. वय १९ वर्षे. बी.कॉम.च्या फस्र्ट इयरला आहे. नुसतं ऐकूनही अंगाचा थरकाप उडावा अशी जोगिंदरची कहाणी आहे.  
जोगिंदर त्यावेळी फक्त चार वर्षांचा होता. त्या दिवशी अचानक ६0 सशस्त्र अतिरेकी त्याच्या घरावर चालून आले. गोळीबाराच्या फैरी सुरू झाल्या. सुरक्षेसाठी जोगिंदरच्या कुटुंबालाही सरकारने शस्त्रं ठेवण्याची परवानगी दिली होती. मोजक्याच बंदुका, मोजकीच माणसं आणि तुटपुंजा ‘दारूगोळा’. आई, वडील, तिन्ही काका, आजी, दीड आणि अडीच वर्षांचे दोन सख्खे लहान भाऊ.  एकएक करत घरातले कामी येत गेले. तरीही जे काही बचावले होते त्यांनी मोर्चा सोडला नाही. तीन अतिरेक्यांना कंठस्नान घातलं. संध्याकाळी सातच्या सुमारास सुरू झालेला गोळीबार दुसर्‍या दिवशी सकाळी १0 वाजेपर्यंत अखंडपणे १५ तास सुरू होता. जोगिंदरचं आयुष्यही तेव्हाच संपलं असतं, पण लहानग्या जोगिंदरला त्याच्या बहिणीनं उचलून मागे फेकलं, त्यामुळे तो वाचला. जोगिंदरच्या कुटुंबातली तब्बल १५ माणसं अतिरेक्यांनी ठार मारली. पाच जण गंभीर जखमी झाले. अतिरेक्यांच्या हल्ल्यात एकाच कुटुंबातली इतकी माणसं कामी आल्याची संपूर्ण देशातली आजपर्यंतची ही सर्वात मोठी घटना.
जोगिंदर सांगतो, आजही या घटनेतला प्रत्येक क्षण मला आठवतो. त्या दिवशी जर आमच्या कुटुंबानं मोर्चा सांभाळला नसता आणि अतिरेक्यांना रोखून धरलं नसतं तर आख्खं गावच बेचिराख झालं असतं. एकही माणूस वाचला नसता.
मी वाचलो, पण अशा जगण्याला तरी काय अर्थ होता? आपण आर्मी ऑफिसर बनावं आणि सार्‍या अतिरेक्यांना कापून काढावं ही आस बरीच वर्षं माझ्या मनात कायम होती. पण काहीही झालं तरी मला शिकायचं होतं. मात्र माझ्याकडे ना पैसा, ना पुस्तकं, ना साधा गणवेश. फी भरायलाही पैसे नव्हते. जम्मू-काश्मीरचे तत्कालीन मुख्यमंत्री गुलाम नबी आजाद एकदा आमच्या परिसरात आले. सार्‍यांना चुकवत मी थेट त्यांच्यासमोरच जाऊन उभा राहिलो आणि त्यांना सांगितलं, एकतर माझ्या शिक्षणाची व्यवस्था करा नाहीतर नोकरी द्या.
त्यांनी ‘सरहद’च्या संजय नहार यांच्याशी संपर्क साधला आणि मी पुण्यात येऊन पोहोचलो.
हाच जोगिंदर आता देशभरात जाऊन युवकांशी संवाद साधतोय. ‘अमन’ आणि ‘भाईचार्‍या’चा संदेश देतोय.
शिक्षणासाठी जोगिंदरला दारोदार फिरावं लागलं, पण आपल्यासारखी स्थिती इतरांवर येऊ नये यासाठी आपल्या परिसरात नंतर शाळा सुरू करण्याचाही त्याचा विचार आहे.
 
 
> स्टॅनझिन दोरजे
१९९९मध्ये झालेलं कारगिल युद्ध आठवतं?
अत्यंत गोपनीय पद्धतीनं पाकिस्ताननं भारतावर हल्ल्याचा कट रचला होता आणि कारगिलमध्ये आपलं सैन्य घुसवलं होतं.
याच परिसरात एक मेंढपाळ होता. ताशी नामगॅल त्याचं नाव. या मेंढपाळानं पाकिस्तानचं हे छुपं सैन्य सर्वात पहिल्यांदा पाहिलं आणि लगोलग त्याची खबर भारतीय लष्करालाही दिलं. त्यामुळे भारतीय लष्कर वेळीच सावध झालं, त्यांना आपले डावपेच रचता आले आणि पाकिस्तानी सैनिकांना तिथून पिटाळून लावताना भारतीय सैन्याने कारगिल युद्धात विजयी पताका फडकावली.
ताशी नामगॅल या ज्या मेंढपाळानं पाकी हल्ल्याची पहिली खबर दिली, त्याचाच स्टॅनझिन हा मुलगा.
स्टॅनझिननं सांगितलं, या घटनेनंतर आमचं कौतुक तर खूप झालं, पण नुसत्या कौतुकानं पोट कुठे भरतं? शिक्षण कुठे मिळतं? ‘सरहद’नं माझी सारी जबाबदारी उचलली आणि सहा महिन्यांपूर्वी मी पुण्यात दाखल झालो. १९ वर्षांंचा कोवळा स्टॅनझिन पुण्यात अकरावी कॉर्मसचं शिक्षण घेतोय.
स्टॅनझिनचं म्हणणं. देशात सध्या सगळीकडे जे अस्थिरतेचं वातावरण आहे, प्रत्येक जण एक-दुसर्‍याकडे संशयाच्या नजरेनं पाहतोय याचं मला फार वाईट वाटतं. अशी परिस्थिती पूर्वी आपल्याकडे नव्हती. सारे एकोप्यानं राहात होते, एक-दुसर्‍याचं दु:ख वाटून घेत होते.
बंधुभावाचं हेच नातं पुढेही कायम राहावं या हेतूनं मी आता देशभरातल्या मुलांशी संवाद साधणार आहे.
 
> आशिक खान
आशिकचे खुद्द वडीलच अतिरेकी होते. तो दहा वर्षांचा असताना आर्मीबरोबरच्या चकमकीत ते मारले गेले आणि आपणही अतिरेकीच बनायचं या ऊर्मीनं त्याला पछाडलं. आईनं त्याला परोपरी समजावलं, पण बंदुकीशिवाय कोणताच विचार त्याला सुचत, पटत नव्हता. मेहबूबा मुफ्ती यांच्या सल्ल्यावरून त्याच्या आईनं शेवटी त्याला पुण्यात ‘सरहद’मध्ये पाठवलं, पण ‘अतिरेकी’च बनायचं हे खूळ डोक्यात घुसलेल्या आशिकनं सुरुवातीला तिथूनही पळ काढला.
आईनं शेवटी गावकर्‍यांसमोरच त्याला फटकारलं. तेरी अब्बा की वजह से आज तक मुझे नसीब हुई सिर्फ बदनामी. तू भी वही करने की जिद ले बैठा, तो मेरे हात से मैं तुझे गोली मार दुॅँगी !.
आशिक परत ‘सरहद’मध्ये आला. हळूहळू त्याच्या डोक्यातलं खूळ गेलं आणि आपल्या विचारांतला वेडगळपणाही त्याला कळला. 
२१ वर्षांंचा आशिक पुण्यात बी.कॉम.च्या सेकंड इयरला शिकतोय.
आशिक सांगतो, सुरुवातीला तर मला हेदेखील माहीत नव्हतं की काश्मीर हा भारताचाच भाग आहे. पण हळूहळू सगळ्याच गोष्टी कळत गेल्या. हिंसाचार कसा वाढतोय, लोकांची मनं कशी कलुषित केली जाताहेत, चूक काय, बरोबर काय?. यातलं कोणीच मला काहीच सांगितलं नाही. पण वातावरण बदलल्यानंतर आपोआपच मला ते कळत गेलं. आपण किती चुकीच्या मार्गावर चाललो होतो याचा पश्‍चात्ताप झाला, पण वेळीच आपण योग्य मार्गावर आलो याचा आनंदही.
‘आय अँम अँन इंडियन’ असं अभिमानानं सांगताना माझा ऊर भरून येतो. विचारांतला ‘अतिरेकी’पणा आणि हिंसा, बंदूक हे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर नाही होऊ शकत हे माझ्याशिवाय अधिक चांगल्या पद्धतीनं आणखी कोण सांगू शकणार?
देशभरातल्या तरुणांना त्यांच्या गावी जाऊन मी स्वत: आता हे सांगणार आहे.
मी चुकलो, पण तुम्ही चुकू नका. एकदा वेळ गेली की पुन्हा कधीच परत येत नाही.
माझी खात्री आहे, माझं म्हणणं माझ्या तरुण मित्रांना नक्की कळेल.
माझं ऐकतील ते.
भोगलेला, आतडी पिळवटून बोलणारा, कुठलाही स्वार्थ नसलेला माणूस आणि त्याचं बोलणं लोकांना कळतंच.
 
रुबिना मीर
काश्मीरच्या कुपवारा परिसरात कायमच दहशतीचं वातावरण. अतिरेक्यांचा वावर. सारीच परिस्थती प्रतिकूल. ना शिक्षणाच्या सोयी, ना रोजगार ना विकास. शिवाय बंदुकीच्या भयानं कायम मुठीत असलेला जीव. तिथेच तिचा जन्म झालाय, पण यातलं काहीच तिला आठवत नाही. कारण कळायला लागलं तेव्हापासून वयाच्या पाचव्या वर्षी ती पुण्यात आली आणि तेव्हापासून तिथेच शिकतेय. 
रुबिना वयानं तशी लहान असली तरी वास्तवाचं शहाणपण तिच्याकडे भरपूर आहे.
रुबिना म्हणते, मी महाराष्ट्रात राहते, म्हणूनच काश्मीरमधल्या परिस्थितीचं अचूक विेषण करू शकते. तिथला तणाव, हिंसाचार, अस्वस्थ खदखद. आणि इथली शांतता, शिक्षणाच्या सोयी, व्यक्तिस्वातंत्र्य. भेदाभेदाच्या सार्‍या भिंती मला मोडून काढायच्यात. देशभरातल्या तरुण-तरुणींना सांगायचंय. एकमेकांना जवळ आणतो तो खरा धर्म, वेदनेला नि:शब्द वाटून घेतो तो धर्म. कोणताच धर्म कधीच कोणाला हिंसा शिकवत नाही. प्रांतांना भले सीमा असू द्या, पण एकमेकांच्या सोबतीशिवाय त्यांना पूर्णत्व नाही. हिंदू असो, मुसलमान असो की आणखी कोणी. प्रत्येकाच्या रक्ताचा आणि नात्याचा रंग एकच असतो, तो म्हणजे प्यार, मोहब्बत. तेच सोबत घेऊन मी देशभर हिंडणार आहे. मला खात्री आहे, रक्ताचं नातं काही झालं तरी तोडून टाकता येत नाहीच. शेवटी ते एकत्र येतंच. त्याला यावंच लागतं. त्याला पर्याय नाहीच.