- डॉ. श्रुती पानसे
( लेखिका मेंदू आणि शिक्षण या विषयातील संशोधिका आहेत.)
एक हुशार डॉक्टर. गोल्ड मेडलिस्ट. पण त्याची प्रॅक्टिस म्हणावी तशी चालत नाही.
एक आय.ए.एस. अधिकारी. परंतु त्याच्यावर त्याचे सहकारी कायम नाराज. त्यामुळे त्याला हवी तशी टीम बांधता येत नाही. याचा त्याच्या कार्यक्षमतेवर खूप परिणाम होतो.
आपले कॉलेजचे किंवा शाळेतले शिक्षक, प्राध्यापक. सगळ्यांकडे पदव्या समानच असतात. मात्र त्यातले काहीच शिक्षक- प्राध्यापक विद्यार्थिप्रिय असतात. मुलांना खूप आवडतात. मुलं त्या शिक्षकांना मान देतात, त्यांचा आदर करतात. बाकीच्यांची टर उडवतात.
असं का होतं?
समान शिक्षण, हुद्दा असलेली काही माणसं यशस्वी असतात. लोकप्रिय असतात. आदरपात्र ठरतात. आणि काही अपयशी नसली तरी लोक त्यांच्याविषयी फार चांगलं बोलत नाहीत. त्यांच्याविषयी आदर वाटत नाही.
असं का होतं, याचा विचार केला तर आपल्या करिअरच्या वाटेवरचा एक मोठा पैलू तुमच्या लक्षात येईल.
होतं असं, अभ्यास करण्यासाठी, पदव्या मिळवण्यासाठी आवश्यक असलेला आय.क्यू. म्हणजे बुद्धय़ांक तर अनेकांकडे असतो, त्याच्या जोरावर ते परीक्षांमध्ये यश मिळवतात; पण यशस्वी होण्यासाठी आणखी एक गोष्ट आवश्यक असते, ती म्हणजे इतरांबरोबर काम करण्याची क्षमता. इतरांच्या भावना लक्षात घेऊन काम करण्यासाठी आवश्यक अशी भावनिक बुद्धिमत्ता. म्हणजेच इमोशनल कोशंट.
भावना या विषयावर आधुनिक पद्धतीने केल्या गेलेल्या मेंदूसंशोधनाने बराच प्रकाश टाकला आहे. यासंदर्भात मेंदूच्या कार्यपद्धतीचा विचार केला तर असं दिसतं, की मेंदूच्या रचनेत भावनेचं एक विशिष्ट क्षेत्र आहे. आपल्या भावनांना एक वेगळी जागा दिलेली आहे. ही जागा म्हणजेच लिंबिक सिस्टीम. आनंद, भीती, दु:ख, प्रेम अशा वेगवेगळ्या छटा इथे निर्माण होतात. बाहेरची परिस्थिती अनुकूल किंवा प्रतिकूल झाली की त्यानुसार आपोआप भावना निर्माण होतात. कधी मनाच्या आतूनही भाव निर्माण होत असतात.
भावना या ब-याचदा बाह्य परिस्थितीवर अवलंबून असतात. पण त्यांच्या नियंत्रणाची दोरी आपल्याकडे असली पाहिजे. यावर एक महत्त्वाचं संशोधन डॅनिअल गोलमन यांनी केलं आहे. त्यांनी अभ्यासलेल्या केसेसमधून जे हाती आलं त्यातून त्यांनी भावनिक बुद्धिमत्तेचा सिद्धांत मांडला. हा विषय नीट समजावून सांगण्यासाठी त्यांनी ‘इमोशनल इंटेलिजन्स’ या नावाचं पुस्तक लिहिलं आहे.
या पुस्तकात डॅनिअल गोलमन बुद्धी, भावना आणि यशाचा संबंध उलगडून दाखवतात.
* माणूस हा भावनांच्या भरात काहीही करू शकतो. बुद्धिमान समजल्या गेलेल्या माणसांच्या हातूनही भावनिक चुका होतात.
* अशा चुका यशाचं रूपांतर अपयशात करू शकतात.
* म्हणून आपल्या भावना हुशारीने, बुद्धीच्या साहाय्याने हाताळल्या पाहिजेत.
* आपल्याला हव्या त्या पद्धतीने भावनांचं नियमन करता येतं. त्यासाठी थोडे प्रयत्न करावे लागतात. पण ते जमू शकतं.
उदा. आपल्याला अभ्यासात किंवा हाती घेतलेल्या कोणत्याही कामात यश मिळालं नाही की खचून जाणं, पर्याय न सुचणं अशा गोष्टी कोणाच्याही हातून घडू शकतात. याचा अर्थ आपण कधीच यशस्वी होऊ शकत नाही, असा होत नाही. कोणत्याही परिस्थितीत नकारात्मक भावनांच्या हाती आपले निर्णय सोपवू नयेत. उलट या नकारात्मक भावनांचं रूपांतर सकारात्मक विचारात करता आलं पाहिजे.
गोलमन यांच्या मते योग्य प्रयत्नाने, स्वत:ला भावनिकदृष्टय़ा समर्थ करता येतं. आपल्या नकारात्मक भावनांवर मात करून सकारात्मक भावना वाढवता आल्या की व्यक्ती जीवनात यशस्वी होते.
म्हणून ते म्हणतात, केवळ बुद्धय़ांकाला काहीच महत्त्व नाही. जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर आपला भावनांक महत्त्वाचा आहे. बुद्धय़ांक वरच्या पातळीवर असेल, परंतु भावनांक कमी असेल तर अशा व्यक्तींचं जीवनात यशस्वी होण्याचं प्रमाण कमी असतं.
हे सारं लक्षात ठेवून आपल्या करिअरच्या वाटेवर आपण भावना कशा हाताळणार याचाही विचार करा!
इक्यू वाढवता येतो का?
आपली भावनिक बुद्धिमत्ता वाढवता येते का?
- तर येते! नक्कीच येते.
भावनिक बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी आवश्यक चार पाय:या आहेत. या चारही पाय:या समजून घेऊन त्याप्रमाणो वागणं ही गोष्ट अवघड आहे, पण अशक्य नक्कीच नाही. अर्थात हे काम झट की पट होणार नाही. स्वत:ला थोडा वेळ द्यावा लागेल. स्वत:वर काम करावं लागेल. खूप काम करावं लागेल. पण ते करून ही बुद्धिमत्ता जर वाढवली तर त्याचा आयुष्यभरासाठी आपल्याला आणि आपल्या जवळच्या माणसांना खूप उपयोग होऊ शकेल!
1) स्वत:ला ओळखणं.
आपण नक्की कसे आहोत, कशानं खूश होतो, चिडतो, रडतो, हारतो, द्वेष करतो असं स्वत:च्या स्वभावाविषयी नेमकं आपल्याला सारं माहिती असायला हवं.
2) स्वत:च्या भावभावना योग्य त्या पद्धतीने नियंत्रित करत येणं.
आपल्या भावना आपल्यावर कधी स्वार होतात, कोणत्या जास्त लवकर व्यक्त होतात, अति टोकाला जातात हे माहिती असणं आणि त्या उत्तम रीतीनं आपल्या आपल्याला हाताळता येणं, ते शिकणं, नियंत्रित करणं महत्त्वाचं!
3) आसपासच्या माणसांना ओळखता येणं, त्यांचे स्वभाव जाणून घेता येणं.
जे स्वत:विषयी तेच इतरांविषयीही. आपल्या आसपासच्या माणसांचे स्वभाव, भावना, व्यक्त होण्याची पद्धत हे सारं समजून घेता येणं महत्त्वाचं.
4) आसपासच्या माणसांशी योग्य पद्धतीने व्यवहार करता येणं.
या चारही पाय:यांमध्ये ‘स्वत:’ हा शब्द फार महत्त्वाचा आहे. जे बदल घडवून आणायचे ते स्व-सूचना पाळून आणि स्वयंप्रेरणोनेच करावे लागतील.
आपण अनेकदा इतरांकडून मदतीची अपेक्षा करत असतो. मदत जरूर घ्यावी. ती आवश्यकच असते; मात्र आपल्यालाही योग्य निर्णय घेता आला पाहिजे. त्यासाठी स्वत:ला काटेकोर पद्धतीने तपासता आलं पाहिजे. त्यासाठी भावनिकदृष्टय़ा सक्षम असलं पाहिजे.