- चिन्मय लेले
फुटबॉल वर्ल्डकपची इत्यंभूत माहिती आपल्याला आहे. मेसी, रोनाल्डो अपयशी ठरले तर आपल्याला दु:ख झालं. मात्र या सार्या उत्सवी गदारोळात तिचं यश काही फारसं साजरं झालं नाही. दीपिका कुमारी तिचं नाव. तिनं महिला तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत नुकतंच सुवर्णपदक जिंकलं. त्या जिंकण्याचं अप्रूप मोठं आहे. कारण सलग सहा वर्षे जी मुलगी अपयशी ठरत होती, तिनं सहा वर्षानंतर विश्वविजयी सुवर्णपदक जिंकून दाखवावं, यामागचा संघर्ष किती मोठा असेल याचा आपण फक्त अंदाजच बांधू शकतो. पण संघर्ष दीपिकाला नवीन नाही. कदाचित त्यामुळेच तिला हे फाइट बॅक करणं जमलं असावं. दीपिकाही झारखंडचीच. रांचीची. तेच रांची जे एम. एस. धोनीच्या संघर्षाची विजयगाथा सांगतं. त्या रांचीपासून जवळच असलेल्या रोनू नावाच्या गावातली दीपिका. घरात गरीबी भयंकर, जेवणाखाण्याचे वांधे. त्याच काळात झारखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या प}ीच्या पुढाकारानं ग्रामीण, आदिवासी मुलांमधलं क्रीडा नैपुण्य शोधून त्यांना प्रशिक्षण देण्याचं काम सुरू झालं. दीपिकाची त्या कॅम्पसाठी निवड झाली. त्यावेळी ती फक्त 12 वर्षाची होती. वडिलांना म्हणाली मला जाऊ द्या, तीनच महिने द्या, नाही जमलं तर तुम्ही म्हणाल तिथं लग्न करून मी निघून जाईन. मात्र त्या कॅम्पमध्ये या मुलीच्या तिरंदाजीनं लक्ष्यभेद केला. आणि पुढे तीन ते चार वर्षातच दीपिका भारताची क्रमांक एकची तिरंदाज बनली. रिओ ऑलिम्पिकर्पयत तिनं धडक मारली. ती तिरंदाजीचं पदक आणणारच अशी चर्चा असताना दीपिका अपयशी ठरली. ऑलिम्पिकमध्येच नाही तर त्यानंतरच्या सर्व मोठय़ा जागतिक स्पर्धेत तिला अपयशाचंच तोंड पाहावं लागलं. ज्या मुलीनं वर्ल्डकपमध्ये चार वर्षे सलग रौप्यपदक आणलं तिला त्यापुढे जाताच येईना. 2010 मध्ये तिनं दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत दोन सुवर्णपदकं जिंकली होती. त्यानंतरच्या वर्ल्डकपमध्येही तिनं सुवर्णपदक जिंकलं.पण त्यानंतर मात्र प्रगतीचा आलेख ढासळला. लंडनच्या स्पर्धेत तर ती पहिल्याच फेरीत बाद झाली. प्रय} सुरूच होते; पण समर ऑलिम्पिक, राष्ट्रकुल, आशियाई स्पर्धा, वर्ल्डकप सर्व स्पर्धात तिची कामगिरी ढासळत गेली. एक ना दोन सलग सहा वर्षे ती हारत होती..दीपिका सांगते, ‘फार डिप्रेसिंग होती ही सहा वर्षे माझ्यासाठी. गेली दोन वर्षे तर फारच वाईट गेली. मनात नको नको ते विचार यायचे. कितीही प्रय} केले तर सकारात्मक विचार करता येत नव्हता, नकारात्मक विचारांनी मला छळलं होतं. वाटायचं, संपलोय आपण. आता यापुढे काहीच करता येणार नाही. सतत अपयशी होत असल्यानं मनावरचा दबावही वाढतच होता. 2015 साली मी रौप्यपदक जिंकले होते, ते शेवटचं. त्यानंतर यश मिळेना. आता थांबावं असं माझ्या मनात यायचं, पण खेळ कायमचा सोडून देणं हा काही पर्याय नाही हे कळत होतं. पण आपण जिंकतच नाही म्हटल्यावर दुसरं करणार तरी काय? कुणाही खेळाडूला असंच वाटू लागतं. रिकामपण आलं होतं. काहीच जमत नव्हतं; पण तरी मी खेळ सोडला नाही. शेवटी यश मिळालंच.फायनली, जिंकले!’आपण कल्पना तरी करू शकतो का? वर्ल्ड चॅम्पियन राहिलेली एक मुलगी सहा वर्षे अपयशाशी झगडते तेव्हा तिच्या मनात काय येत असेल?दीपिका सांगते, ‘ कशानं जिंकले? एकतर मला जिंकायचंच होतं. माझ्या तंत्रात काही सुधारणा करण्यात आल्या. मानसिक सरावही भरपूर केला. एक डेडलॉक आला होता मनातच, तो तोडणं फार सोपं नव्हतं. जमेल आपल्याला या भावनेर्पयत पोहोचण्याचा हा प्रवास होता. तो जमला म्हणून पुढचं यश दिसलं!’आता हे जमलं तर पुढचंही जमेल या भावनेनं दीपिका जकार्ताच्या आशियाई स्पर्धेकडे पाहतेय. आणि त्यानंतरचं लक्ष्य आहे टोक्यो ऑलिम्पिक. मात्र त्याहूनही महत्त्वाचं आहे, तिच्या जिद्दीचं यश. कुठं झारखंडमधलं रोनू, कुठं वर्ल्ड चॅम्पियनशिप. हा प्रवास हीच एक यशाची गोष्ट आहे. नेटफिल्क्सवर ‘लेडीज फस्र्ट’ नावाची एक फिल्म आहे. ती दीपिकाची गोष्ट सांगते. ती फिल्म पाहताना ग्रामीण-आदिवासी भारताचं एक दर्शन होतं. ज्या भारताला आजही मुलींचं खेळणं हा खेळ वाटत नाही. मुलींना चुलाचौका यापलीकडे काही फार जमत नाही असं वाटतं. त्या फिल्ममध्ये दीपिका म्हणते, ‘जो कहते है लडकियां कुछ नहीं कर सकती, वो डरते है लडकियोंसे.’डर के आगे जित है, हे तिनं शब्दशर् जगून दाखवलं आहे. आता अपयशावर मात करण्याचा संघर्ष संपला, जिंकण्याची लढाई आता कुठं सुरू झाली आहे.