Whats on your mind ? असं एरव्ही कुणी आपल्याला विचारलं असतं, तर काय उत्तर दिलं असतं आपण? मुळात दिलं असतं तरी का? आपल्या मनात नेमकं काय चाललंय, हे अनेकदा आपलं आपल्याला कळत नाही, इतरांना काय सांगणार? आणि सांगितलंच तरी, जाहीरपणे चारचौघांत
भाषण केल्यासारखं बोललो असतो का? मला जाम भूक लागलीये ! फिलिंग, पार पकलोय !
फिलिंग प्राऊड ! फिलिंग लॉस्ट ! .असं ‘फिलिंग अमुकतमुक’ लोकांना सांगण्याची धमक
होती का आपल्यात? पण आज आहे? कुणामुळे? कशामुळे?
आपल्या हातातला मोबाइल, आपण भसकन ‘मोबाइल डाटा’ ऑन करतो, व्हॉट्स अँपवर जातो.
ज्याला म्हणून जे म्हणून सांगायचं असतं, ते मनात ठरवतो. आणि ‘त्या’ माणसांचं ‘लास्ट सीन’ चेक करतो. ‘लास्ट सीन’ची वेळ नुकतीच सरलेली असली किंवा ‘ऑनलाइन’ असं स्टेटस दिसलं की, आपण मस्त सुखावतो. बेधडक मनातलं बोलून टाकतो. टाइमपास करतो, फॉरवर्ड करतो.
पण जे काय करतो ते रिअल टाइम. हे असं क्षणाक्षणाचं, अगदी एकमेकांसोबतच असल्यासारखं
‘रिअल टाइम’ शेअरिंग, हे मनातलं बोलणं, हे ‘सांगून टाकणं’ पूर्वी कुठं होतं आपल्या आयुष्यात?
पण आज आहे?, कुणामुळे? कशामुळे?
आपण ट्विटरचं अकाउंट उघडतो, पंतप्रधान मोदींपासून अमिताभ बच्चन आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ओबामा ते फुटबॉलपटू मेस्सीपर्यंत वाट्टेल त्याला फॉलो करतो, एरव्ही जी माणसं आपल्या टप्प्यातच नव्हती, ती आता थेट आपल्या जवळ आली, ते जे म्हणतात ते आपण थेट वाचतो, ऐकतो,तिसर्या कुणी आपल्याला सांगायचं गरजच उरली नाही. मध्यस्थांची गरज संपली. हे कशामुळे झालं?
आपण ब्लॉग्ज लिहू शकतो, मनात येईल ते मांडू शकतो, रांगेत उभं न राहता, न ताटकळता ऑनलाइन बिलं भरू शकतो, तिकिटं काढू शकतो, शॉपिंग करू शकतो. आपल्या ‘कण्ट्रोल’मध्ये आल्या अनेक गोष्टी! कुणामुळे? कशामुळे?
त्याचं उत्तर एकच, इंटरनेट बेस्ड टेक्नॉलॉजी! त्या टेक्नॉलॉजीने सामान्य जगण्याला नवा कनेक्ट दिला!
प्रश्न एवढाच, आपण त्या ‘कनेक्ट’चं करणार काय? ताकद म्हणून वापरणार? एकत्र येऊन काहीतरी खास घडवणार? की, फक्त टाइमपास करत एक मोठी संधी वाया घालवणार?