आयपीएलच्या जबरदस्त यशानंतर जवळपास प्रत्येक खेळामध्ये लीग स्पर्धांचे आयोजन झाले. हॉकी, फुटबॉल, टेनिस यांसारख्या खेळांच्या व्यावसायिक लीग स्पर्धा पार पडल्या. मात्र ज्या खेळातील लीग स्पर्धेच्या यशाची कोणी हमी देत नव्हते त्या, कबड्डी खेळाच्या ‘प्रो कबड्डी’ लीगने मोठा धमाका केला. आयपीएलनंतर गाजलेली मोठी स्पर्धा म्हणून प्रो कबड्डीकडे पाहिले जाते. या लीगच्या माध्यमातून का होईना महाराष्ट्राच्या मातीतला हा खेळ आज घराघरांत पोहोचला. येत्या १८ जुलैपासून प्रो कबड्डीच्या दुसऱ्या सत्राची मुंबईत दिमाखात सुरुवात होईल. यानिमित्ताने गतउपविजेत्या ‘यू मुंबा’ संघाच्या विशाल माने, रिशांक देवाडीगा, ओंकार जाधव आणि विनोद अत्याळकर या चार खेळाडूंनी ‘लोकमत’ मुंबई कार्यालयाला भेट दिली आणि यंदा विजेतेपद जिंकण्यासाठी सर्वच प्रतिस्पर्धी संघासोबत ‘पंगा’ घेण्यास सज्ज असल्याचे सांगितले. या वेळी रोहित नाईक यांनी त्यांच्याशी केलेली बातचीत...गतस्पर्धेचा अनुभव कसा होता आणि यंदाच्या स्पर्धेची तयारी कशी झाली आहे?- खरेतर, आम्हाला स्वप्नातही वाटले नव्हते इतक्या मोठ्या स्तरावर खेळण्याची संधी मिळेल. गेल्या वर्षीचा अनुभव खूपच चांगला होता. सर्वकाही नवीन असल्याने खूप मजा आली. खूप नावारूपास आलो. तसेच त्या वेळी निर्णायक क्षणी झालेल्या चुकींमुळे आमचे विजेतेपद थोडक्यात हुकले. मात्र यंदा कोणतीही कसर न ठेवता विजेतेपद पटकावण्याच्या उद्देशानेच उतरणार. तसेच गेल्या स्पर्धेत आम्हाला फिटनेसचा फटका बसला होता. या वेळी सर्व खेळाडू पूर्ण फिट असून, फिटनेस कायम राखण्यावर आमचा अधिक भर आहे. त्याचबरोबर यंदा संघामध्ये पर्यायी किंवा बदली खेळाडूंचीदेखील मजबूत फळी असल्याने आम्ही पूर्ण ताकदीने सज्ज आहोत. मातीवर खेळण्यापेक्षा मॅटवर खेळण्यात किती फरक जाणवतो? - आम्हाला मॅटवर खेळणं जास्त आवडतं. मॅटवर पकड खूप चांगली मिळते. त्याचवेळी मॅटवर खेळण्यासाठी फिटनेस महत्त्वाची असते. जर तुम्ही फिट असाल तरच तेथे उत्कृष्ट खेळू शकाल. आज प्रत्येक खेळात बदल होत आहेत. कबड्डीमध्येदेखील हे आवश्यक होतं. मातीच्या मैदानांच्या तुलनेत मॅटवरील खेळ अधिक वेगवान झाला असून, तो अधिक आव्हानात्मकदेखील झाला आहे.या लीगचा फायदा कसा झाला?- खेळ आणि खेळाडू दोघांनाही खूप फायदा झाला. आज लीगमुळे कबड्डी आणि कबड्डीपटू घराघरांत पोहोचले आहेत. युवावर्ग करियरच्या दृष्टीने कबड्डीचा विचार करू लागला आहे. या लीगमुळे कबड्डी पूर्णपणे बदलली आहे. आता कबड्डीचा खेळ पूर्वीसारखा राहिला नाही. खूप मोठ्या संख्येने प्रेक्षकवर्ग मिळाल्याने कामगिरीत सातत्य राखण्याचे आव्हान मिळाले. साहजिकच यामुळे खेळाचा दर्जादेखील उंचावला आहे. खेळाबरोबरच आमचाही चाहतावर्ग निर्माण झालेला असल्याने त्यांच्या अपेक्षांचे ओझे काही प्रमाणात असून, चाहत्यांना निराश करणार नाही.स्पर्धेत कोणता संघ तगडा आहे?- या स्पर्धेत सगळेच संघ तुल्यबळ आहेत. कोणत्याही एका संघाचा उल्लेख करता येणार नाही. मुळात संघात कितीही मोठा खेळाडू असला तरी, प्रत्यक्षात मैदानात जो चांगला खेळतो त्याचाच संघ विजयी होतो. त्यामुळे कोणालाही कमी लेखण्याची चूक येथे महागात पडू शकते. तरी, गेल्या वर्षी जयपूर पिंक पँथर विरुद्ध आमचे विजेतेपद थोड्याकरता हुकले होते. यंदा त्या पराभवाचा वचपा आम्ही काढूच. शिवाय प्रत्येक संघाला पहिल्या स्पर्धेचा अनुभव असल्याने यंदाची स्पर्धा अत्यंत अटीतटीची होईल यात शंका नाही.‘यू मुंबा फ्युचर स्टार्स’ या उपक्रमातून संघात या वेळी नवे चेहरे आहेत का?- हो, नक्कीच आहेत. या उपक्रमातून आम्हाला ओंकार जाधव आणि विनोद अत्याळकर हे युवा खेळाडू मिळाले आहेत. हे दोन्ही खेळाडू उत्तर आक्रमक असून, त्यांची तयारी चांगली झाली आहे. स्पर्धेतील कोणत्याही सामन्यात ते खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत. नवीन असल्याने त्यांच्यावर थोडेसे दडपण आहे, मात्र संघातील अनुभवी खेळाडूंकडून प्रतिकूल परिस्थितीमध्ये कसे खेळावे यांसारख्या गोष्टी ते शिकत आहेत. जेव्हा संधी मिळेल तेव्हा हे दोन्ही खेळाडू नक्कीच आपली चमक दाखवतील.संघातील परदेशी खेळाडूंसोबतच्या अनुभवाबद्दल काय सांगाल?- संघामध्ये बांगलादेश, इराण आणि जपानच्या प्रत्येकी एका खेळाडूचा समावेश आहे. या सर्वांसोबत खेळताना खूप चांगले अनुभव आहेत. त्यांचे खेळण्याचे तंत्र खूप चांगले आहे, पण ते अनुभवात मागे पडतात. आमचा खेळ सगळेच जाणून आहेत. मात्र या परदेशी खेळाडूंचा खेळ सहजासहजी कोणाला माहीत नाही. त्यामुळे या तिघांचाही संघाला निर्णायक फायदा होऊ शकतो. या लीगमुळे त्यांनाही खूप काही शिकायला मिळत आहे. त्याचबरोबर आम्हीदेखील खेळाच्या बाबतीत बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडून शिकत असतो.आज कबड्डी इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये झळकत आहे. काय म्हणाल?- निश्चित कबड्डीसाठी ही खूप चांगली गोष्ट आहे. पूर्वी केवळ मराठी किंवा हिंदी भाषिक वृत्तपत्रांंमध्ये कबड्डीचे वृत्तांकन व्हायचे. या लीगमुळे कबड्डीची क्रांती झाली आहे. शिवाय कबड्डी इतक्या उच्च स्तरावर पोहोचली आहे ती केवळ मीडियामुळे. मीडियामुळे हा खेळ प्रसिद्धीस आला आहे. कबड्डीचे सुवर्णदिन सुरू झाले आहेत असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.तुमचं वर्षभर वेळापत्रक कसं असतं?- खरे म्हणजे हा आमचा आॅफ सिजन आहे. या वेळेतच प्रो कबड्डीचे आयोजन होत असते. मुंबईच्या दृष्टीने बोलायचे झाल्यास यानंतर आम्ही मुंबई निवड चाचणी, राज्यस्तरीय, राष्ट्रीयस्तरीय तसेच कॉर्पोरेट अशा स्पर्धांमध्ये वर्षभर खेळत असतो. आम्ही कॉर्पोरेट स्पर्धा अधिक खेळतो. ज्या कंपनीकडून आम्ही खेळतो, त्या कंपनीला विविध विजेतेपद मिळवून देण्याची जबाबदारी आमच्यावर असते. त्यामुळे वर्षभर आम्ही कबड्डीमध्येच व्यस्त असतो.यंदा ‘यू मुंबा’चा दणका बसणार?- नक्कीच. आम्ही पूर्ण तयारीने सज्ज आहोत. विजेतेपद पटकावण्यासाठी आम्ही समोर येणाऱ्या प्रत्येक संघाशी ‘पंगा’ घेणार. या वर्षी आमच्याकडे बदली खेळाडूंची मजबूत फळी आहे. तसेच युवा व अनुभवी खेळाडूंमुळे संघ अधिक समतोल बनला आहे. मुंबईकरांना विजेतेपदाची भेट देण्यासाठी आम्ही आतुर आहोत.
यू मुंबा ‘पंगा’ घेण्यास सज्ज
By admin | Updated: July 5, 2015 01:27 IST