मुंबई : लॉस एंजेलिस (अमेरिका) येथे २५ जुलै ते २ आॅगस्ट दरम्यान पार पडणाऱ्या ‘स्पेशल आॅलिम्पिक्स वर्ल्ड गेम्स’ स्पर्धेसाठी भारताचा संघ सज्ज असून या स्पर्धेसाठी ‘वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट’ने (डब्ल्यू.डब्ल्यू.ई.) भारतीय संघाला आपला पाठिंबा दर्शवला आहे. या स्पर्धेत भारतीय संघ ‘स्पेशल आॅलिम्पिक्स भारत’ या नावाने सहभागी होणार असून शुक्रवारी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमामध्ये याबाबत माहिती देण्यात आली. २४ जुलैला रात्री भारतीय संघ लॉस एंजेलिसला रवान होणार आहे.‘स्पेशल आॅलिम्पिक्स भारत’चे राष्ट्रीय क्रीडा संचालक व्हीक्टर आर. वाझ व डब्ल्यूडब्ल्यूई इंडियाचे महाव्यवस्थापक रुकिन किझिबाश यांनी भारतीय संघातील निवडक खेळाडूंच्या उपस्थितीत स्पर्धेबाबत माहिती दिली. दरम्यान यावेळी आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते भारतीय संघाच्या जॅकेटचे अनावरण देखील झाले. यावेळी स्नेहा वर्मा, दिशा मारु (दोघेही स्विमिंग), नितीन सिंग, फातिमा रॉड्रिग्स (दोघेही बास्केटबॉल), प्रिया गडा (रोलर स्केटींग), मिहिर सोनी आणि विपुल जैन (दोघेही सॉफ्टबॉल) या खेळाडूंची उपस्थिती होती.एकूण १७० देशांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत भारताचा खेळाडू, प्रशिक्षक आणि अधिकारी असा एकूण ३२०हून अधिक सदस्यांचा मोठा चमू सहभागी होणार आहे. अॅथलेटीक्स, अॅकेवेटीक, बोक्के, बास्केटबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस, व्हॉलिबॉल, फुटबॉल, पॉवरलिफ्टींग, रोलर स्केटींग, हँडबॉल, सायकलिंग आणि गोल्फ या खेळांमद्ये भारताचे खेळाडू पदक मिळवण्यासाठी प्रयत्न करतील. या स्पर्धेत भारताकडे बलाढ्य प्रतिस्पर्धी म्हणून पाहिले जाते. २०११ साली झालेल्या गतस्पर्धेत १८४ खेळाडूंचा सहभाग असलेल्या भारताने तब्बल २४८ पदकांची लयलूट करताना ७८ सुवर्ण, ७७ रौप्य आणि ९३ कांस्य पदाकांचस कमाई केली होती. यामुळेचे भारताच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल.(क्रीडा प्रतिनिधी)
‘विशेष’ खेळाडूंना डब्ल्यूडब्ल्यूईचा ‘खास’ पाठिंबा
By admin | Updated: July 18, 2015 00:33 IST