मुंबई : हुकमी गोलंदाज शार्दुल ठाकूरचा भेदक मारा आणि त्याला इतर गोलंदाजांनी दिलेली उत्तम साथ या जोरावर यजमान मुंबईने रणजी ट्रॉफीच्या ‘ब’ गटातील साखळी सामन्यात रेल्वेचा पहिला डाव २१७ धावांत गुंडाळला. यानंतर मुंबईकरांची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. सलामीवीर जय बिस्त व नाईट वॉचमन म्हणून आलेला धवल कुलकर्णी स्वस्तात बाद झाल्याने मुंबईची पहिल्या दिवसअखेर २ बाद ४ धावा अशी अवस्था झाली.वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेला या सामन्यातील पहिला दिवस गोलंदाजांनी गाजवला. गतमहिन्यात झालेल्या भारत - दक्षिण आफ्रिका एकदिवसीय सामन्यानंतर वानखेडेची खेळपट्टी चर्चेचा विषय ठरली होती. यानंतर झालेल्या उत्तर प्रदेशविरुद्धच्या रणजी सामन्यातही दोन्ही संघांच्या फलंदाजांनी सुमारे १२००च्या आसपास धावा केल्या होत्या. त्यामुळेच या सामन्यातही फलंदाज वर्चस्व गाजवणार असे दिसत होते. मात्र गोलंदाजांनी सगळी सूत्रे आपल्याकडे ठेवली.नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या रेल्वेची सुरुवात अडखळती झाली. शार्दुल आणि धवल कुलकर्णी यांनी टिच्चून मारा करून रेल्वेच्या फलंदाजांना जखडवून ठेवले. यानंतर शार्दुलने आपला हिसका दाखवला. त्याने सलामीवीर सौरभ वाकसकर आणि व्ही. चेलुवराज यांना बाद केले. पुढच्याच षटकात कुलकर्णीने आशिष सिंगला बाद करून रेल्वेला तिसरा धक्का दिला. व्ही. सिंग आणि अरिंदम घोष हे संघाला सावरणार असे दिसत असताना पुन्हा एकदा शार्दुलने रेल्वेला धक्का देत व्ही. सिंगला यष्टीरक्षक तरेकडे झेल देण्यास भाग पाडले आणि प्रतिस्पर्ध्यांना ४ बाद ४८ असे अडचणीत पकडले.या वेळी मुंबईकर रेल्वेला जोरदार ‘ब्रेक’ लावणार असे चित्र दिसत असतानाच घोष व एस. एस. मिश्रा यांनी पाचव्या विकेटसाठी ८५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. पुन्हा एकदा शार्दुलने मुंबईला यश मिळवून देताना मिश्राला बाद केले. मिश्राने १२८ चेंडूंत ५ चौकार व एका षटकारासह ४६ धावा काढल्या. एका बाजूने घोष खंबीरपणे रेल्वेची धावसंख्या पुढे नेत होता. मात्र इतर फलंदाजांची योग्य साथ न लाभल्याने त्यांचा डाव ८ बाद १८३ असा घसरला. यानंतर झुंजार अर्धशतकी खेळी करणारा घोषही परतला. त्याने १८३ चेंडूंत ५ चौकारांसह ६७ धावांची संयमी खेळी केली. धवल कुलकर्णीने अखेरचा फलंदाज अनुरीत सिंगची यष्टी उखडून रेल्वेचा डाव २१७ धावांत संपुष्टात आणला. शार्दुलने सर्वांत यशस्वी मारा करताना १९ षटकांत ३८ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. तर कुलकर्णी आणि हरमीत सिंग यांनी प्रत्येकी २ बळी घेत त्याला चांगली साथ दिली. विशाल दाभोळकर आणि जय बिस्त यांना प्रत्येकी एक बळी घेण्यात यश आले. (क्रीडा प्रतिनिधी)धावफलक रेल्वे (पहिला डाव) : सौरभ वाकसकर झे. तरे गो. ठाकूर ४, आशिष सिंग झे. तरे गो. कुलकर्णी ३, व्ही. चेलुवराज झे. यादव गो. ठाकूर ७, व्ही. सिंग झे. तरे गो. ठाकूर २८, अरिंदम घोष झे. यादव गो. दाभोळकर ६७, एस.एस. मिश्रा झे. तरे गो. ठाकूर ४६, महेश रावत झे. हेरवाडकर गो. हरमीत १६, कर्ण शर्मा झे. ठाकूर गो. बिस्त ४, अक्षत पांड्ये झे. हेरवाडकर गो. हरमीत १२, अर्णब नंदी नाबाद ७, अनुरीत सिंग त्रि. गो. कुलकर्णी १९. अवांतर - ४. एकूण : ८४.४ षटकांत सर्वबाद २१७ धावा.गोलंदाज : धवल कुलकर्णी १६.४-५-४०-२; शार्दुल ठाकूर १९-७-३८-४; विशाल दाभोळकर २६-५-७८-१; हरमीत सिंग १६-२-४१-२; जय बिस्त ७-१-१८-१.मुंबई (पहिला डाव) : अखिल हेरवाडकर खेळत आहे २, जय बिस्त झे. मिश्रा गो. अनुरीत सिंग २, धवल कुलकर्णी त्रि. गो. शर्मा ०. अवांतर - ०. एकूण : ३.५ षटकांत २ बाद ४ धावा.गोलंदाजी : अनुरीत सिंग २-१-३-१; कर्ण शर्मा १.५-१-१-१.
रेल्वेला २१७ धावांत रोखले
By admin | Updated: November 16, 2015 02:31 IST