नवी दिल्ली : जागतिक आंतरविद्यापीठ तिरंदाजी स्पर्धेच्या कांस्यपदकाच्या लढतीसाठी वेळेवर न पोहोचणाऱ्या तीन तिरंदाज आणि त्यांच्या कोचवर एआययूने (भारतीय विद्यापीठ संघ) तीन वर्षांसाठी बंदी घालण्याचा निर्णय घेतला. शिवाय या दौऱ्यातील खर्च त्यांच्याकडून वसूल करण्यात येणार आहे.तिरंदाज गुरविंदरसिंग, कंवलप्रितसिंग आणि अमन हे तीन खेळाडू व त्यांचे कोच जीवनज्योत सिंग यांच्यावर बेपर्वा वृत्ती, नियमांचे उल्लंघन तसेच आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर देशाची प्रतिमा खराब करणे, बदनामी व नामुष्की होईल असे कृत्य केल्याचा ठपका ठेवण्यात आला.कंपाउंड प्रकारात सहभागी झालेले तिरंदाजांचे हे त्रिकूट ३ ते १४ जुलै या कालावधीत ग्वांगझूमध्ये झालेल्या विश्व आंतरविद्यापीठ स्पर्धेत कांस्यपदकाच्या लढतीत इटलीविरुद्ध खेळले नव्हते. एआययूने संबंधित सचिवांना लिहिलेल्या पत्रात लिहिले की, ‘हे खेळाडू स्पर्धेच्या कांस्यपदकाच्या लढतीत वेळेवर पोहोचले नाहीत. त्यांनी बेपर्वाई करीत देशाची बदनामी केली. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताला बदनामी सहन करावी लागली.’ या तिघांवर २०१५ ते २०१८ या काळात आंतर विद्यापीठ तसेच विश्व आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी बंदी लागू राहील. या तिरंदाजांना त्यांची निवड, सराव आणि प्रतिनिधित्व यावर झालेला खर्च आणि विमान प्रवासाचा खर्च परत करावा लागेल. हा खर्च प्रतिखेळाडू पाच लाख इतका आहे. (वृत्तसंस्था)
...त्या तिरंदाजांवर तीन वर्षांची बंदी
By admin | Updated: July 23, 2015 00:47 IST